चुकीचा पायंडा पाडण्याचा भाजपचा प्रयत्न
मुुंबई (प्रतिनिधी) – कर्नाटकात जे सुरू आहे ते लोकशाहीला घातक आहे. तेथे चुकीचा पायंडा पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, कर्नाटक सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खतपाणी घालत आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केला.
नवा पायंडा अयोग्य
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शासकीय पूजेत सहभागी होणार आहेत. विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे. आता यावेळी नवा पायंडा पाडला जातोय ते योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी येऊन पूजा करणे हे पांडुरंगालाही मान्य नव्हते. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना केवळ औपचारिकता पूर्ण करायला मुख्यमंत्र्यांनी येणे विठ्ठलाला आणि लोकांनाही मान्य नव्हते, असे अशोक चव्हाण म्हणाले.
सध्या कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्यावरून राज्यातील विरोधी पक्ष कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या 13 आमदारांनी राजीनामे देत थेट मुंबई गाठली आहे. मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांची बडदास्त ठेवण्यात आली आहे. कर्नाटकातील कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी आज आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यापार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी गृह खाते सांभाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर टीका केली.
पोलिसांच्या बंदोबस्तात आमदारांना बंदिस्त करण्यात आले आहे. ते कॉंग्रेसचे आमदार असल्याने त्यांना कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटू न देणे ही दडपशाही आहे, असे चव्हाण म्हणाले. गोवा, मणिपूरमध्ये जे झाले तेच आता कर्नाटकात केले जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.