मुंबई : राज्यात पुरामुळे ओढवलेल्या आपत्तीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे या निधीत योगदान देण्यासाठी अनेकविध सहृदयी पुढे येत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत (गुरुवार, 15 ऑगस्ट 2019 पर्यंत) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वीस कोटी रूपयांहून अधिक निधी जमा झाला आहे.
राज्यभरातून विविध सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील घटक, व्यावसायिक, त्यांच्या संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत प्रत्यक्ष जमा करणे किंवा पाठविणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या काही हजारांपासून, सामुहिकरित्या एकत्र केलेल्या लाखो रुपयांपर्यंतची मदत सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा ओघ सुरु झाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार या निधीत योगदान देणारे विविध घटक असे, सैफी फाऊंडेशनकडून एक कोटी रुपये, सारस्वत बँकेच्या वतीने एक कोटी रुपये, आकाश इन्स्टिट्युटच्यावतीने 51 लाख रुपये, अलॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडकडून 50 लाख रुपये, इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून 25 लाख रुपये, सद्गूरू श्री श्री साखर कारखाना यांच्यावतीने 22 लाख रुपये, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 25 लाख रुपये, मर्सिडीज बेंझ कंपनीच्यावतीने 25 लाख रुपये आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्यावतीने तीन लाख 60 हजार रुपये, खासदार रणजिंतसिह निंबाळकर यांच्याकडून 25 लाख 52 हजार 852 रुपये, भारतीय जनता पार्टी, मुंबई उत्तर पश्चिम विभागाच्याकडून 21 लाख रुपये, बोरीवली मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने 25 लाख रुपये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने सतरा लाख 72 हजार रुपये यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधीं, उद्योजक, व्यावसायिक, त्यांच्या संघटना विविध संस्था-संघटना, मान्यवरांकडून निधीसाठी धनादेश स्वरुपात योगदान देण्याचा ओघ सुरुच आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या पुरस्काराची 50 हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केली आहे.