पुणे – “नीरा-देवघर’ धरणातील डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
सिंचन भवन येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, “बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. दर तीन महिन्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर बैठक घेत असते. दुष्काळाच्या प्रश्नावर हे सरकार संवेदनशील नाही. तसेच हे सरकार वास्तवापासून दूर आहे.’
“नीरा-देवघर’चा विषय हा माणुसकीचा प्रश्न आहे. कोणत्याही भागाचा प्रश्न नाही. पाण्याच्या प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये. या प्रश्नी मुख्यमंत्री निर्णय घेतील.
पाणी चोरीचा विषय नाही : खासदार निंबाळकर
“नीरा-देवघर’ धरणातून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ते म्हणाले, “नीरा-देवघर’प्रश्नी येत्या 3-4 दिवसांत निर्णय होणार आहे. आमच्या कोट्यातीलच पाण्याची मागणी आम्ही करतोय. कोणाचेही पाणी चोरण्याचा हा विषय नाही. तसेच पाणी प्रश्नावर राजकारण करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.