मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटपात गृहखाते कोणाला मिळणार यावर चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे खाते जाणार असल्याचे बोलले जाते.
मात्र, गृहमंत्री कोण होणार हे फक्त मुख्यमंत्रीच ठरवणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकत्र बैठक घेऊन कोणाला कोणती खाती, कोणते कार्यालय व सरकारी निवासस्थान द्यायचे ठरवतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी गृहमंत्रीपदाबाबत खुलासा केला. खातेवाटप कधी होणार या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खातेवाटप झालेले आहे. मुख्यमंत्री आणि अन्य सहा मंत्री खातेवाटप होऊन काम करीत आहेत.
बाकीचं खातेवाटपही लवकरच होईल. आमच्या आघाडीतील कॉंग्रेस पक्षाचे नेते दिल्लीला गेले आहेत. तिथे असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. तिथे त्यांची वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. ती चर्चा करून बाळासाहेब तिथून निघाले आहेत.
बाळासाहेब मुंबईत पोहोचले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे तिघे बसून बाकीच्या मंत्र्यांना कुठली खाती, कुठल्या फ्लोअरवर ऑफिस, त्याचप्रमाणे सरकारी घर द्यावं हे ठरवणार आहे. हे सर्व वरिष्ठतेनुसार ठरणार असून लवकरच मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील आणि खातेवाटपाचा अध्यादेश निघेल, अजित पवार यांनी सांगितले.