मुंबई – मागील दोन वर्षे चाललेला करोना आणि त्यातच प्रकृती अस्वस्थामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे राज्याच्या दौऱ्यावर नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र आता उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असून राज्याचा दौरा करणार असल्याचं समजतं.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत राज्यासह देशात लॉकडाऊन लागला होता. या कालावधीत मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बहुतांश बैठकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहात होते. त्यामुळे घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका विरोधकांनी केली. त्याच टीकेला मुख्यमंत्री ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यातून उत्तर देणार आहेत.
उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर शेतकरी, कष्टकऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यांच्या समस्या जाणून घेतील. सोबतच शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मुंबईतील सभेने त्याला सुरुवात होणार आहे. मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री ठाकरे राज्यच्या दौऱ्यावर जाणार असून ते लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.