मुंबई :निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा कोकण किनारपट्टीला बसला आहे. या वादळाची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात होती हे आता समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघतील. मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास असेल. त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देतील.
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असतील. याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळ मागे अनेक पाऊलखुणा सोडून गेलं आहे. अनेकांचे संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.