मुंबई – राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता केल्यानंतर काही दिवसांतच करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. यासोबतच डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोकादेखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत.
डेल्टा विषाणूपासून बचाव की, पळ? मुख्यमंत्री @OfficeofUT महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहताहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे. #MahaCovidFailure
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून सरकारवर निशाणा साधला आहे. “डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे”, असं अतुल भातखळकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान,आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असणार आहेत. महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे.
काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्यांचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.