पुणे (प्रभात वृत्तसेवा) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री बारा वाजता, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट तसेच आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा यांची भेट घेऊन विचारपूस केली.
यावेळी उदय सामंत यांच्या वाहनावर पुण्यात झालेल्या हल्ल्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा चुकीच्या पद्धतीने वागत आहेत म्हणजे पायाखालची वाळू सरकली आहे. निष्ठा यात्रा मारामारी करण्यासाठी काढली आहे का त्यांनी? भडकाऊ भाषणे करायची आणि हल्ले करायचे. कायद्यासमोर कोणी मोठा नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे. जनतेला कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये. या घटनेत पोलीस योग्य ती कारवाई करतील.
हा भ्याड हल्ला आहे. दगडफेक करून पळून जायचे ही कसली मर्दुमकी?
आमचे सगळे आमदार कायद्याचे पालन करणारे आहेत. शिस्तीचे पालन करणारे आहेत. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घेणारे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने समोरच्यांना चुकीच्या पद्धतीने वागता येणार नाही.