सोलापूर (प्रतिनिधी) – मोदींच्या नेतृत्वात देश विकासाकडे वाटचाल करत आहे. मोदींच्या नेतृत्वात अमेरिकेत 1 लाख लोकांची सभा झाली. त्या सभेत डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. या पूर्वी अशा कोणत्याही भारतीय नेत्याची सभा अमेरिकेत झाली तरी एक मंत्रीही उपस्थित नसायचे. मोदी फक्त भारताचे नाही तर जगाचे नेते आहेत. त्यांचे वैश्विक नेतृत्व जगाने मान्य केले आहे. मोदींना बहुमत दिले म्हणून कलम 370 हटवून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम सरकारने केले, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.
सोलापूरमधील 923 गावं दुष्काळमुक्त
शेतकऱ्याला गेल्या 5 वर्षात 50 हजार कोटी रुपये दिले. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रलंबित सिंचनाची कामे पूर्ण करण्यासाठी युती सरकारने निधी दिला. जलयुक्त शिवारसाठी योजना केली. सोलापूर जिल्ह्यातील 923 गावं दुष्काळमुक्त केली. दिड लाख लोकांना विहीरी दिल्या, 5 लाख लोकांना पंपमुक्त केले. सांगली, सातारा कोल्हापूर येथे पूर आला, मात्र पूराचं पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकरी कधी अडचणीत येणार नाही, दुष्काळाचं सामना करावा लागणार नाही. येत्या 5 वर्षात हे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 30 हजार किमी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ते तयार केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका जवळ आल्या तरी आमची लढाई कोणाशी हे कळत नाही, समोर कोणी दिसत नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण समोर लढणारा पैलवान तयार नाही, अशी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे.
कॉंग्रेसचे प्रमुख नेते निवडणूक असताना बॅंकॉंकला फिरायला गेले. शरद पवारांची अवस्था “आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बचे तो मेरे पीछे आओ’ अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे. या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. भाजपा-शिवसेना मित्रपक्षाच्या महायुती अभूतपूर्व यशाने निवडून येणार याबाबत शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपली हार आधीच मान्य केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात अशी आश्वासन दिली की त्यांना खात्री आम्ही निवडून येणारच नाही. 15 वर्षे महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. 15 वर्षाचा हिशोब मांडा, या 5 वर्षात आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट काम केले. या दोन्ही कामाची तुलना केली तर निश्चित 5 वर्षाचं काम सर्वात जास्त होईल. ज्या-ज्या वेळी आमचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.