नवी दिल्ली – राज्यात निवडणुकीचे वारे सध्या जोराने वाहत आहेत. सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळेल यात शंका नाही. परंतु मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे अमित शाह यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
अमित शहा म्हणाले कि, महाराष्ट्रातील लोक पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. गेल्या वर्षात भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या विकासकामांमुळे मतदार पुन्हा आम्हाला साथ देतील. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची जोडी राज्यासाठी चांगले काम करत आहे. नरेंद्र-देवेंद्र फॉर्म्युला राज्यातील लोक आणि कार्यकर्त्यांसाठी काम करत आहे. पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता.
ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र वेगाने प्रगती करीत आहे. आधीचे सरकार पाच वर्षात महाराष्ट्राला १.२२ लाख कोटी रुपये देत असे. आमच्या सरकारने ४.७८ लाख कोटी रुपये दिले. यामुळे आता विकास कामे शेवटच्या स्तरातील जनतेपर्यंत पोहोचत आहेत.
अमित शहा यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल तर उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम घेईल, असेही स्पष्ट केले आहे.