मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात गुवाहाटीतील हॉटेलमध्ये शिंदेसह त्यांच्या गटातील आमदार थांबले होते. त्यावेळी शिंदेसह सर्वांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. अशात आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांच्या गटातील आमदार आता पुन्हा गुवाहाटीतीला देवीच्या दर्शनासाठी निघाले आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,’आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असं वाटत नाही, असं शिंदे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले,’आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. आम्ही भक्तीभावाने जात आहोत, असंही ते म्हणाले. दरम्यान, स्पेशल विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी साधारण 12 वाजेपर्यंत गुवाहाटीत उतरतील. त्यानंतर दुपारी ते देवीचं दर्शन घेतील.