रस्ते अपघातात हकनाक बळी गेलेल्यांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?
मुंबई: अवघ्या तीन महिन्यात राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा कक्षाने सादर केलेल्या अहवालानुसार ९ हजार ९६ रस्ते अपघातांत ३ हजार ४३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात रस्ते अपघातात हकनाक बळी गेलेल्यांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? याचे उत्तर फडणवीस सरकारने द्यावे, अशे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, देशभरात रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. आजवर फडणवीस सरकारने रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. कायदे, नियम कडक करूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांचे ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करत असलेलं हे सरकार राज्यातील रस्ते सुरक्षा आणि रस्तेदुरुस्तीबाबात कधी काम करणार आहे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.