नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यातील सत्तापेचावर निर्णय देत राज्यात उद्याच बहुमत चाचणी घेण्याची आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर या चाचणीसाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निवडून गुप्त पद्धतीने मतदान न घेता मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत उद्याच्या बहुमत चाचणीसाठी आवशयक ते निर्णय घेतले जातील. अशी माहिती समोर आली आहे. बैठकीसाठी आशिष शेलार, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन, भूपेंद्र यादव यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही बैठकीसाठी हजेरी लावली आहे.
तसेच या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या निर्णयानंतर आम्ही न्यायालयाच्या निर्णयचा आदर करतो. आम्ही बहुमत चाचणीसाठी तयार असून आम्ही बहुमत सिध्द करून दाखवू. असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात 27 नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घेण्यात यावी.
बहुमत चाचणी हंगामी अध्यक्षच घेतील. तसेच या चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, यात कोणतेही गुप्त मतदान नको, असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रामण्णा यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व आमदारांचा शपथ विधी झाला पाहिजे असा आदेशही न्यायमूर्ती रामण्णा यांनी दिला आहे.