मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपहासात्मक टिका
मंगळवेढा (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपात सामील करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन्हींही पक्षावर उपहासात्मक पध्दतीने टिका केली आहे. महाराष्ट्रात आता लढायचं कुणाबरोबर हाच माझ्यापुढे प्रश्न आहे, असा सवाल त्यांनी केला.
मंगळवेढा येथे झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. मागील पाच वर्षाच्या काळात भाजप सरकारने एकही भ्रष्टाचार न करता पारदर्शक कारभार केला आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याबरोबरच शासनाच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम भाजप सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत विरोधकांचे म्हणावे तेवढे आमदार निवडून येतील का नाही शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत दिले. हे संकेत नसून विरोधी पक्षात बसण्यासाठीची धडपड सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना नाव घेता टोला लगावला.
याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात सातत्याने येणा-या महापूरचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळा भागात वळविणार आहे. त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. तसेच मंगळवेढ्यातील बसवेश्वर व चोखोबा स्मारक लवकर पूर्णत्वास येईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.