नांदेड – महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष फुटावा आणि या पक्षातील जास्तीत जास्त आमदार भाजपामध्ये सामिल व्हावे यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असुन ते आमच्या आमदारांना रोज फोन करतात असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बंपर यश मिळाले. तर कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. कॉंग्रेसचे 8 ते 10 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस कॉंग्रेस आमदारांना भाजपात घेण्यासाठी फोन करत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपण स्वतः कॉंग्रेस आमदारांच्या संपर्कात असून कोणीही पक्ष सोडून जाणार नाहीत, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत कॉंग्रेसने बैठक घेतली. त्यात राष्ट्रवादी विरोधात सूर व्यक्त केला. राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, तर वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करावी, अशा भावना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मांडल्या आहेत.