नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करत असताना घातलेल्या शर्तींचे उल्लंघन त्यांनी केले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. केंद्रीय मंत्री म्हणून आपला कारभार खूप स्वच्छ असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला होता.
चिदंबरम यांच्याविरोधातील ते अर्थमंत्री असताना कथितरित्या सहभागी असलेल्या प्रकरणाचा खटला भ्रष्टाचाराचा खटला असायला हवा होता, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकरांशी बोलताना म्हटले आहे. कालच जामिनावर सुटलेले चिदंबरम हे स्वतःलाच प्रशस्तीपत्रक देत असल्याची टीकाही जावडेकर यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन मंजूर करताना त्यांच्या खटल्याशी संबंधित कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू नये, अशी अट घातली होती. मात्र चिदंबरम यांनी पहिल्याच दिवशी या अटीचे उल्लंघन केले आहे. कॉंग्रेस मुख्यालयात चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. “मंत्री म्हणून आपले काम आणि आपला विवेक शुद्ध आहेत. म्हणूनच गेल्या 106 दिवसांमध्ये मी मनोधैर्य उंच होते.’ असे चिदंबरम म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर अनेक मुद्दयांवरून टीकाही केली होती.
चिदंबरम यांना माध्यमांशी बोलण्याची संधी बऱ्याच दिवसांनी मिळाली. म्हणूनच त्यांनी आपला राग व्यक्त केला, असेही जावडेकर म्हणाले. कॉंग्रेसचे काही नेते तुरुंगात आहेत. काही जण नुकतेच बाहेर आले आहेत, म्हणूनच ते एवढे आगतिक झाले. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झालेला नही, तर गुन्हेगारी आरोपांमुळे हा तुरुंगवास झाला असेही जावडेकर म्हणाले.