नवी दिल्ली – कॉंग्रेसने शनिवारी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली. त्यामुळे पक्ष पंजाबपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदल करणार असल्याच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले.
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी बघेल यांना कॉंग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक बनवण्यात आले. ती मोठी जबाबदारी मानली जात असली तरी छत्तिसगढविषयीच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्तिसगढमध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन मुख्यमंत्री देण्याचा फॉर्म्युला कॉंग्रेसने निश्चित केल्याचा दावा त्या पदाचे दावेदार आणि मंत्री टी.एस.सिंगदेव करत आहेत.
त्यावरून छत्तिसगढमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात काही दिवसांपासून बघेल यांचे समर्थक असणारे कॉंग्रेस आमदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. नेतृत्वबदल न करण्याच्या मागणीसाठी ते दिल्ली मुक्कामी असल्याचे बोलले जाते. अशात बघेल यांच्यावर उत्तरप्रदेश निवडणुकीची जबाबदारी सोपवली गेली आहे.
अर्थात, निवडणूक रणनीती आखण्यात बघेल यांना तरबेज मानले जाते. काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसने त्यांच्यावर आसाम विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्या राज्याची सत्ता मिळवण्याचे कॉंग्रेसचे स्वप्न भंगले. मात्र, बघेल यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली. त्या राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात त्यांनी मोलाचा हातभार लावला.