-माधव विद्वांस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील सर्वात सुंदर आणि सर्वात गर्दीचे रेल्वे स्टेशन आहे. 20 जून 1887 रोजी हे कार्यान्वित झाले. कार्यालयीन इमारत व दर्शनी भागांचे बांधकाम 1888 मध्ये पूर्ण झाले. सुरुवातीस सध्याच्या स्टेशनपासून पूर्वेस बोरीबंदर हे स्थानक होते. बोरी म्हणजे साठवणीची किंवा स्टोअरची जागा व त्यावरून बोरीबंदर हे नाव रूढ झाले.
वर्ष 1888 मध्ये नव्याने स्टेशन उभारणी झाली व राणीच्या राज्यारोहणाच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमानिमित्त याला “व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नाव देण्यात आले. वर्ष 1996 मध्ये नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले. वर्ष 2006 मध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित केले गेले. हे रेल्वेस्टेशन मुंबईची तसेच भारतीय रेल्वेची शान आहे.
आर्किटेक्ट फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी या इमारतीच्या आराखड्याचे संकल्पचित्र केले होते. यासाठी त्यांनी 16.14 लाख रुपये शुल्क आकारले होते. शिवाय अतिरिक्त 5 हजार रुपयांची मागणी केली होती. ही गोष्ट वर्ष 1888 मधील आहे. भारतातील हे वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक रेल्वे स्थानक बांधण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला (1878 ते 1888).
इमारतीच्या दर्शनीभागात मधोमध असलेला ब्रिटिश गॉथिक शैलीतील आकर्षक घुमट लक्ष वेधून घेतो. यावर असलेल्या कमानी व छोटे मनोरे या इमारतीची शोभा अधिकच वाढवितात. स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या घुमटाच्यावर पांढऱ्या रंगामध्ये “द लेडी ऑफ प्रोग्रेस’ची मूर्ती आहे. सुमारे 18 फूट उंचीच्या या मूर्तीच्या डाव्या हातात एक चाक आहे जे प्रगतीच्या दिशेने प्रगती किंवा गतिशीलता दर्शवते. “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ प्रमाणे तिच्या उजव्या हातात ज्वलंत मशाल आहे. या मनोऱ्याकडे जाण्यासाठी आतील बाजूने सुंदर लाकडी नक्षीकाम केलेला जिना आहे. एखाद्या शाही महालात असावेत असे तेथील दरवाजे आहेत. खिडकीची तावदाने सुंदर रंगविली आहेत. एका खिडकीवरील मोराचे उठावचित्र लक्ष वेधून घेते. त्यामध्ये जवळून पाहिल्यास एका खिडकीच्या तळाशी एक शिल्प दिसते.
लोकांची विविधता दर्शविणारे भारतातील विविध भागातील 14 वेगवेगळ्या पगड्या घातलेले लोक येथे दिसून येतात. या स्थानकाच्या बाहेर दोन सिंहाच्या सुंदर प्रतिमा आपले स्वागत करतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस असलेल्या कक्षामधे रेल्वेचा इतिहास सुंदर रीतीने मांडलेले एक छोटे संग्रहालय आहे. रेल्वे सुरू झाली त्यावेळची वेळापत्रके जाहिराती बघताना आनंद वाटतो. त्यावेळी लोकांनी रेल्वे टपाल या गोष्टी सहजपणे स्वीकारल्या नव्हत्या. त्यासाठी हर तऱ्हेच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या.