या राज्यातील एकही निवडणूक छत्रपती शिवरायांचे नाव न घेता झाली नाही. तरीही छत्रपतींचे नाव घेणाऱ्या साऱ्या पक्षातील नेते भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार अशा आरोपात सापडतात हे दुर्दैवी आहे. छत्रपतींच्या नावाचा धाक या राजकारण्यांवरही असावा, हीच अपेक्षा!
शिवराय असे शक्तीदाता म्हणत प्रत्येक आधुनिक मावळा महाराजांच्या कीर्तीची, शौर्याची, इतिहासाची, स्वराज्याची ज्योत मनामध्ये तेवत ठेवत आपल्या आयुष्याची दिशा ठरवीत असतो. या दिशा ठरविण्याच्या प्रवासात असंख्य बाबींना त्याला सामोरे जावे लागतेय. यामध्ये राजकारण नामक व्यवस्थेचा पहिला क्रमांक लागतो. महाराजांना पाच दशकांचे आयुष्य लाभले. या आपल्या अल्पकालीन आयुष्यामध्ये इतिहासाला हेवा वाटावा असा इतिहास महाराजांनी निर्माण केला. समकालीन स्थितीमध्ये महाराजांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, त्याअनुषंगाने आजच्या शिवजयंतीनिमित्त विचार करणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती ही केवळ महाराष्ट्र आणि देशभर मर्यादित नसून ती जगभर आहे. त्यांनी निर्माण केलेल्या तंत्रांचा, व्यवस्थेचा, राज्यकारभाराचा आजही जगभर वापर केला जातोय. ती शिवकालीन व्यवस्था आजही कालातीत आहे. मात्र, आज त्याकडे दुर्लक्ष करीत, केवळ महाराजांच्या नावे राजकारण केले जातेय! सध्याची राजकीय समीकरणे पाहिली की वाटते आपण खरेचं छत्रपतींच्या राज्यात राहतोय का? महाराजांच्या नावाचा सर्वाधिक वापर जर कोणी केला असेल तर तो राजकीय पक्षांनी!
सत्तेमध्ये येत असताना महाराजांच्या नावाचा पुरेपूर वापर करायचा आणि एकदा सत्ता हस्तगत केली की मग महाराजांच्या विचारांना जाणीवपूर्वक बाजूला करीत आपला स्वार्थ साधायचा! हा अलिखित नियम बनला आहे.शेती, आर्थिक, कष्टकरी, स्त्रिया, विकास, न्यायव्यवस्था, महसूल, पर्यावरण, धार्मिक, रोजगार, संरक्षण अशी महाराजांची अनेक धोरणं आजही लागू होतात. मात्र आपल्या राजकीय स्वार्थापायी ही आदर्श धोरणं नाकारली जाताहेत.
शिवछत्रपतींसारखे लोककल्याणकारी आणि रयतेच राज्य असावं या धारणेचा अभाव आजच्या नेत्यांमध्ये दिसतो.
जनभावनेचा विचार करता शिवस्मारक झाले पाहिजे मात्र, प्रत्येक निवडणुकीत त्याबद्दल चर्चांना उधाण येत राहील. वास्तवामध्ये ते कधी पूर्णत्वास येईल, हे सांगणे कठीण आहे. सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या किल्यांचे संरक्षण आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे. यावर कोणताच राजकीय पक्ष ठाम भूमिका घेऊन कार्यवाही करताना दिसत नाही. गड किल्यांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या जाज्वल्य इतिहासाला हानी पोहोचवतोय!
महापुरुषांच्या नावांचा वापर करण्याची राजकीय पद्धत आपल्या देशात चालत आलेली आहे. सध्या तीच प्रमुख पद्धत प्रचाराची दिशा ठरवीत आहे. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची आवश्यकता असताना त्यांचा राजकीय स्वार्थापायी वापर होणे ही शोकांतिका आहे. विशेषतः यास एकही राजकीय पक्ष अपवाद नाही. कोणत्याही राजकीय षड्यंत्राचा भाग न बनत, छत्रपतींचा वारसा जपत त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सुराज्य निर्माण करणे हे आपणा सर्व आधुनिक मावळ्यांचे कर्तव्य आहे. सर्वांना शिवजयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
– श्रीकांत येरूळे