– प्रा. भा. ब. पोखरकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे वर्णन एका पोर्तुगीज इतिहासकाराने- परेन यांनी पुढीलप्रमाणे केले आहे. “साहसप्रेमी आणि धाडसी, आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर, मनमिळावू आणि सौजन्यशील स्वभाव, उत्स्फूर्त आणि तरल बुद्धिमत्तेचा-झटपट निर्णय घेणारे-दूरदृष्टीचे प्रतिभावान राजपटू, कुशल संघटक, दिल्लीचे मोगल, विजापूरकर, तुर्क, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या प्रतिस्पर्ध्यांशी चतुराईने राज करणारा राजा.’
इ.स. 1630 च्या फाल्गुन वद्य तृतियेला (19 फेब्रुवारी 1630) शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंच्या पोटी तेजपुंज तारा जन्माला आला, त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजे हे जिजाऊसाहेबांचे 6वे चिरंजीव. त्यात संभाजी आणि शिवाजी ही दोनच मुले जगली. शिवनेरीवर लहानपणी मातीचे गडकोट करून “हे गड माझे म्हणणाऱ्या’ राजांनी मोठेपणी 360 दुर्ग बांधून स्वराज्य शाश्वत केले. शिवाजीराजे गडपती होते. दुर्ग बांधणीचा त्यांचा विशेष अभ्यास होता. जिंजीचा बेलाग दुर्ग ताब्यात आल्यावर त्यांनी जुनी तटबंधी पाडून नवी उभारली. मोक्याच्या ठिकाणी बुरूज बांधले. रामदास स्वामींनी शिवाजीराजांना गडपती असे म्हटले आहे.
स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांचे त्यांनी संरक्षण केले, म्हणजे महाराष्ट्र धर्माची जागृती केली. मुघलांचे मर्दन केले. बादशहाला मुरगाळून टाकलं. शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी वाहिले. जुलमी सत्तेविरुद्ध आवाज उठवला. मोगलांच्या काळात माता-भगिनींवर होणाऱ्या अत्याचारांवर पायबंद घातला. स्वसामर्थ्याने इतर सत्ताधीशांवर वचक बसवून संपूर्ण हिंदुस्थानावर एकछत्री अंमल निर्माण करण्याचे ध्येय ठेवले. मराठी माणसाला स्वतंत्रपणे ताठ मानेने जगण्याची प्रेरणा दिली. शिवाजीराजे सर्वांसाठी सुशील असले तरी शत्रू आणि गुन्हेगार यांना योग्य वेळी आळा घालण्याची कला त्यांना उत्तम अवगत होती.
अफजलखानाचा वध करताना, शाहिस्तेखानाची बोटे तोडताना, दिल्लीत औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करताना राजांनी दाखविलेले धाडस आणि चतुराई अजोड होती. शिवाजीराजांचे हेरखाते खूप प्रभावी होते. शिवाजीराजे हे समकालीन मंडळींचे स्फूर्तिस्थान आणि प्रेरणास्थान बनले होते. राजांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. शिवाजीराजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करवून घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वतः राजसिंहासनावर आरूढ होऊन राजवंश निर्माण केला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. भरकटलेल्या समाजव्यवस्थेला त्यांनी नवी दृष्टी दिली, नवी दिशा दिली. आपल्या बोलण्याने माणसे जोडली गेली पाहिजेत, अशी शिकवण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यांच्यामध्ये संकटाशी लढण्याची विलक्षण ताकद होती. नशीब नेहमी धाडसाला साथ देते आणि धाडस तर आपल्या रक्तातच आहे अशी त्यांची विचारधारा होती.
स्वराज्य रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी स्वतःला या मातीत गाडून घेतले म्हणून महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल झाला, म्हणून सह्याद्रीच्या कड्यांची उंची वाढली. अलौकिक दिव्यत्व असलेला राजा. प्रत्येकक्षणी स्वराज्य हिताचा विचार करणारा राजा. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार वंदन…