पुणे/खडकवासला -“छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे नव्हे, तर जगाचे “हीरो’ आहेत,’ असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राज्यपाल कोश्यारी यांनी स्वातंत्र्य दिनी किल्ले सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व अधिकारी विलास वाहने, सचिन बारवकर उपस्थितीत होते.
“छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यांच्यासारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील,’ असे राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्यपालांनी लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामाची माहिती जाणून घेतली.