मुंबई – करोनाच्या संकटकाळात ठाकरे सरकारने पोलीस भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 12 हजार 500 पदे भरली जाणार आहे. परंतु, पोलीस भरतीचा निर्णय हा मूर्खपणा असल्याची टीका खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी टीका केली आहे.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले कि, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाज पेटून उठला आहे. मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे. त्यासोबतच राज्यावर करोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे विविध विभागातील भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. राज्यात 12 हजार 500 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने याचा फारसा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्याचे दिसत आहे.