मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका विधायक नाही : भाजप प्रवक्ते माधव भांडारी
पुणे – मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका विधायक नाही. महाराष्ट्रात आलेले आघाडी सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत किती गंभीर आहे हा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची भीती रास्त आहे, असे मत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी पक्षाचे संपर्क विभागाचे प्रमुख विश्वास पाठक, संजय मयेकर, विकास लवटे आदी उपस्थित होते.
शेतकरी खलिस्तानी आहेत, असे कुठेही म्हटलेले नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली जे आंदोलन चालवत आहेत ते खलिस्तानी आहेत. तसेच त्यांना चीन प्रोत्साहन देत असून, आंदोलन चिघळवण्यासाठी मदत करत आहे, अशा आरोपाचा पुनरुच्चार भांडारी यांनी केला. एल्गार परिषदेला आधी राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. आता विरोध करून त्यांना राजकारण करायचे आहे, अशी टीकाही भांडारी यांनी केली.
मेळाव्याला शेतकरी मिळत नाहीत, अशी टीका भाजपवर केली जात आहे. मुळात मेळावे अद्याप झालेच नाहीत तर शेतकरी मिळत नाही ही निरर्थक टीका आहे. बहुतेक सत्ताधारी पक्षांना तसे स्वप्न पडले असावे, असे भांडारी म्हणाले. उद्या जो शेतकऱ्यांना दिला जाणारा हफ्ता आहे तो शेवटचा आहे, या आधीचे हफ्ते देण्यात आले आहेत. दिलेले पैसे परत घेतले असे कोठेही घडले नाही, असे भांडारी यांनी नमूद केले.
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वायपेयी यांचा
25 डिसेंबर हा जन्मदिवस “सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी तो “किसान विकास सन्मान दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. पुण्यात भूगाव आणि हडपसर येथे शेतकरी मेळावे आयोजित केले असून, त्याला अनुक्रमे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.