माधव विद्वांस
दुष्काळ, गृहभेदी आणि अफाट मोगली सैन्यांशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने 10 वर्षे लढा देणारे शिवपुत्र संभाजी महाराज यांची आज जयंती. संभाजी महाराजांचा जन्म किल्ले पुरंदर येथे 14 मे 1657 रोजी झाला. त्यांचे मातृछत्र ते लहान असतानाच हरपले. संभाजीराजांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई सोयराबाई व पुतळाबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली. लहानपणीच त्यांनी संस्कृतचा अभ्यासही केला होता व बुधभूषण हा ग्रंथही लिहिला होता. ते लहान असतानाच छ. शिवाजी महाराजांनी त्यांना औरंगजेबाच्या आग्रा येथील भेटीसाठी नेले होते. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांचे पितृछत्रही हरविले.
त्रिचनापल्लीपर्यंत त्यांनी दक्षिणेत यशस्वी मोहीम केली. जंजिरा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी रामायणातील सेतूबंधाची शक्कल लढविली होती. त्यांनी रातोरात दंडाराजपुरीजवळ जंजिरा किल्ला व किनाऱ्यामध्ये दगडांचा भराव करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात काही कारणांनी यश मिळाले नाही. तरी योजना आश्चर्यकारक होती. ते स्वतः अश्वपारखी होते. औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी संभाजी महाराजांपेक्षा पाचपट सैन्य त्यांच्याकडे होते. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली शूर मावळ्यांनी लढा दिला.
मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. आपल्या पत्नीला त्यांच्या गैरहजेरीत राज्यकारभाराचे अधिकार देणारे पहिले राजे संभाजी महाराज होते. स्वतः संभाजी महाराजांनी त्यांना “श्री सखी राज्ञी जयति’ असा शिक्का बहाल करून शिक्के-कट्यारीचे पद दिले होते. त्यांची स्वतःची राजमुद्रा पुढीलप्रमाणे होती श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते । यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ।। त्याचा अर्थ : शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालिवते.
1 फेब्रुवारी, इ.स. 1689 रोजी संभाजीराजे संगमेश्वरजवळील कसब्यामध्ये मुक्कामाला होते. त्याच रात्री औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने देसाईवाड्यास वेढा टाकला व संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे सुचविले, पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांना क्रूरपणे ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना दिल्या तरी महाराजांनी शरणागती पत्करली नाही. 11 मार्च 1689 रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे त्यांची हत्या करण्यात आली.