आपल्या अवतीभवती आपण असे अनेक दाम्पत्य पाहतो, ज्यांची एकमेकांना अशीच घट्ट साथ असते… कितीही मोठे संकट आले तरी एकमेकांचे हात हातात घेऊन ते संकटांना सामोरे जातात… मात्र, या प्रवासात सर्वाधिक त्रास सोसावा लागतो तो स्त्रियांनाच… आपल्या पतीला साथ देणे हे जरी तिचे कर्तव्य असले तरी अख्ख्या कुटुंबाला प्रेमाच्या, विश्वासाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवण्याची अवघड जबाबदारीही स्त्रियांनाच पार पाडावी लागते. प्रेमविवाह करूनही एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्श समाजासमोर ठेवलेल्या एका दाम्पत्याची ही संघर्षमय कहाणी!
सुजाता चोरडिया यांचा जन्म पुण्यातील भवानी पेठेतील सांकला कुटुंबात 25 डिसेंबर 1963 ला झाला. सुजाता यांना लहानपणापासून शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. यासाठी त्यांनी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. घरची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने त्यांचे डॉक्टर व्हायचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न दृष्टीक्षेपात असतानाच दिलीप चोरडिया यांच्याशी त्यांची ओळख झाली. दोघांचे स्वभाव जुळले. छान मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दिलीप चोरडिया हे गरीब कुटूंबातील असल्याने त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी कुटुंबियांनी तीव्र विरोध केला. मात्र, सुजाता यांनी न डगमगता होतकरू दिलीप यांना खंबीर साथ देण्याचा निर्णय घेतला. अखेर 3 ऑक्टोबर 1981 ला रुढी, परंपरा झुगारत पुण्यातील एका मंदिरात अतिशय साधेपणाने प्रेमविवाह केला. यानंतर खऱ्या अर्थाने सुजाता यांच्या संघर्षमय आयुष्याची सुरुवात झाली.
पतीचे कमी शिक्षण, त्यामुळे मर्यादित कमाई, त्यांचा सात भावंडाचा आणि 60 सदस्यांचा मोठा परिवार, बेताची आर्थिक परिस्थिती, समाजातील चालीरिती व माहेरच्या माणसांचा तीव्र विरोध हे सर्वकाही सुजाता यांच्या संयमाची आणि पर्यायाने प्रेमाची परीक्षा पाहणारे होते. मात्र, त्यांनी आपले पती दिलीप चोरडीया यांना कुठल्याही परिस्थितीत खंबीर साथ द्यायचे ठरवले होतेच. म्हणूनच परिस्थितीचा स्वीकार करून हसतमुखाने त्यांनी आपले नवे वैवाहिक आयुष्य सुरू केले.
लग्नानंतरच्या काळात सुजाताताईंचे पती दिलीप चोरडिया यांना अल्प पगार होता. त्याकाळात ते व्हीसीआर भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. सुजाता यांच्या माहेरची आर्थिक स्थिती चांगली होती. लग्नापर्यंत आरामात आयुष्य जगलेल्या आपल्या आवडी, निवडी जपणाऱ्या सुजाता यांचे साहजिकच लग्नानंतर आयुष्य बदलले होते. जुन्या रुढी परंपरा, मोठ्या परिवारातील सदस्यांसोबत कसे वागावे याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हते. मात्र, त्यांनी यावेळी चिडून न जात मोठ्या धीराने परिवार व पतीला खंबीर साथ दिली. लक्ष्मीच्या पावलांनी सारे घर भरून निघते, असा एक समज आहे. त्याचप्रमाणे चोरडिया कुटुंबात सुजाताताई आल्या आणि परिवाराची भरभराट झाली, असे त्यांच्या कुटूंबातील अन्य सदस्य सांगतात. दिलीप चोरडिया यांच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे सुजाता या उभ्या राहिल्या. हळूहळू पतीचा बांधकाम व्यवसायात जम बसत गेला. त्यांना टप्प्या-टप्प्याने यश मिळत गेले. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून दिलीप चोरडिया यांना ओळखले जाते.
याकाळात सुजाता यांना आयुष्यातील अनेक चढ-उतार पहायला मिळाले. ही त्यांच्या प्रेमाची परीक्षाच होती. मात्र, त्यांनी या काळात आपल्या पतीला व आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आल्या परिस्थितीला धीराने सामोऱ्या गेल्या. त्या कठीण काळातील आठवणी सांगतांना सुजाताताई म्हणाल्या की, या दरम्यान एक वेळ अशी आली होती की आम्ही पती-पत्नीने विष घेऊन आयुष्य संपवण्याचा विचार केला. मात्र, कुटुंबातील अन्य सदस्यांनी आमची समजूत घालत, आमचे मन वळवले. त्या काळात सासरच्या माणसांनी मला माहेरची आठवणही येणार नाही, इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने माझा सांभाळ केला. माझी सासरची मंडळी किती मोठ्या मनाची आहेत, हे मला तेव्हा कळले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला मनापासून समजून घेणारा पती आणि प्रेमळ सासरची माणसे भेटली.
सुजाता यांना लग्नासाठी शिक्षण सोडावे लागल्याने डॉक्टर होता आले नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य व समाजातील गरजूंना आजही मानसिक आधार दिल्याने त्यांच्या आयुष्यात चांगले बदल झाले. निव्वळ पुस्तकी शिक्षण महत्वाचे नसून व्यावहारीक शिक्षण हे महत्वाचे असते, असे त्यांचे ठाम मत आहे.
याकाळात घरात पैसा येत होता. मात्र, समाजासाठी काही देणे असते याचे भान राखून चोरडिया दाम्पत्याने यथोचित दानधर्म सुरू केले. समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, गरजूंना मदत करणे अशा कामातून त्यांना समाजाचे ऋण फेडण्याचे समाधान मिळत गेले. काही वर्षांपूर्वी भूकंप झालेल्या किल्लारी येथे भूकंपग्रस्त नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुजाताताई आणि दिलीप चोरडिया यांनी पुढाकार घेत सढळ हाताने मदत केली. तर, फ्रेंड सर्कल ग्रुपच्या माध्यमातून शहरात दांडिया कार्यक्रमाचे आयोजनात मोठी भूमिका बजावली. आजही समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी चोरडिया दाम्पत्य धावून जातात. पुढील आयुष्यात अनाथ आश्रम उभारुन वृद्धांची व अनाथांची सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे.
चोरडिया यांचे 60 सदस्यांचे मोठे कुटुंब आहे. या कुटुंबात सुजाता यांनी समन्वय साधण्याचे मोठे काम केल्याचे त्याचे पती दिलीप चोरडिया सांगतात. प्रेमविवाह असतानाही एकत्र कुटुंबीपद्धतीला महत्त्व देणाऱ्या सुजाताताईंबद्दल त्यांना अभिमान वाटतो. सुजाताताईंना कुणाल व विशाल ही दोन मुले आहेत. कुणाल बांधकाम व्यवसाय करतो, तर विशाल हॉटेल व्यवसाय सांभाळतो. आयुष्याच्या उत्तरार्धात आपण अत्यंत समाधानी असल्याचे सुजाताताई सांगतात. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतानाच स्वतःच्या आवडी-निवडी त्या जपतात. त्यांना फावल्या वेळात चित्रपट, नाटक पाहणे आवडते. खरेदीला जाणे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणेही त्यांना रूची आहे. त्या म्हणतात, मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना दिलीप चोरडिया यांच्या सोबत लग्नाचा घेतलेला निर्णय योग्यच होता. घेतलेल्या निर्णयाची कधीच खंत वाटली नाही. सध्याच्या “झटकन लग्न आणि पटकन घटस्फोट’च्या जमान्यात लग्नानंतर केवळ नवऱ्यालाच नाही, तर त्याच्या कुटुंबियांनाही जपावे लागते, तरच खऱ्या अर्थाने संसार यशस्वी होतो, अशी शिकवण देणाऱ्या सुजाताताई या नक्कीच आदर्श ठरतील.