पुणे – भारती विधि महाविद्यालयाने आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेतील मुलींच्या विभागात अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी 26.5 गुणांची कमाई केली. ही स्पर्धा भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आली होती.
भारती विधि महाविद्यालयाकडून के.जी.वैष्णवी (6), सई कुशल (5.5), प्राची शर्मा (5.5) व मनस्वी शर्मा (4.5) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. भारती कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने उपविजेतेपद पटकाविले. त्यांनी 19.5 गुणांची कमाई केली. त्यांच्याकडून व्ही. कीर्ती हिने 6 गुण मिळविले. तिला पी.सेजलनेही चांगली साथ दिली. सैजलला 5.5 गुणांची कमाई केली. शेवटच्या फेरीत कीर्तीने प्राची शर्माविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. सईलाही के.जे.वैष्णवीविरूद्धचा डाव अनिर्णित सोडवावा लागला. हा डाव रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी जिद्दीने विजय मिळविण्यासाठी अनेक डावपेच केले.
अखेर डावातील गुंतागुंत वाढल्यामुळे दोन्ही खेळाडूंनी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. प्रिया गुप्ताने हर्षदा महाजनला पराभूत केले तर सेजलने कोमल झा हिच्यावर शानदार विजय मिळविला. हर्शनाकुमारी हिने सुरेख व्यूहरचना करीत आरती धातुंडेला हरविले. अनुष्का चढ्ढाने समृद्धी शहाचा पराभव करताना उत्कृष्ट डावपेचांचा उपयोग केला. दिशा चोरडियाने समृद्धी पिलानेचा पराभव केला.