मुंबई इंडियन्स संघ सोडण्यासाठी आपल्याला धमकी मिळाली होती, असा गौप्यस्फोट रॉबिन उथप्पाने केला. हा खुलासा त्याने रवीचंद्रन अश्विनशी झालेल्या एका संवादातून बाहेर आला. पण प्रश्न आता असा निर्माण होत आहे की हे तो जे बोलला ते खरे आहे का व जर हे खरे असेल तर त्यातील तथ्य बाहेर यावे.
2009 साली झालेल्या मोसमातील एक घडलेली घटना उथप्पाने सांगितली. उथप्पाला मुंबईची साथ सोडायची नव्हती. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याला मुक्त करण्याचे निश्चित केले होते. त्यावेळी जर त्याने मुक्त होण्यास नकार दिला असता तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलेच गेले नसते व जे हाल सनरायझर्स हैदराबादने डेव्हीड वॉर्नरचे केले तेच मुंबई इंडियन्सने उथप्पाचे केले असते. इतकेच नव्हे तर वॉर्नरचा जो अपमान हैदराबादने केला तेच उथप्पालाही भोगावे लागले असते. साधारण हेच जेवण यजुवेंद्र चहलसमोर 2013 साली आले होते.
बुलिंग हे क्रिकेटमध्येच नव्हे तर कोणत्याही खेळात नवे नाही. त्याचा फटका अनेकांना बसला आहे. फक्त चहल व उथप्पाने त्याला वाचा फोडली इतकेच. मुंबई इंडियन्सकडून खेळताना चहललाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले होते. उथप्पाला तर संघातील एका खेळाडूने तसेच संघ व्यवस्थापनाशी संबंधित एका व्यक्तीने ही बातमी दिली होती. त्याचे नाव उथप्पाने घेतलेले नसल्याने या व्यक्तीला शोधणे गरजेचे आहे.
उथप्पा आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. त्याचे चेन्नईच्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. धोनीच्याच पुढाकाराने त्याला 2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले हे कोणीही नाकारणार नाही. या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने मिळवले व उथप्पासाठीही आयपीएल स्पर्धेच्या लिलावात मोठ्या रकमेच्या कराराचे द्वार खुले झाले. मात्र, आता प्रश्न हा आहे की तो जे बोलला ते खरे असेल तर आयपीएल स्पर्धाही बदनाम व्हायला वेळ लागणार नाही.
हे साधे प्रकरण नसून त्याबाबत बीसीसीआय व आयपीएल समितीने गंभीर होण्याची गरज आहे. हा सगळा प्रकार 2009 सालची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी घडला व कंटाळून उथप्पाला या कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागली. त्यावेळी नक्की काय घडले, त्यात कोण जबाबदार होते. त्यावेळी काय परिस्थिती होती याचा तपास केला जावा. जितके गांभीर्य मॅच फिक्सिंगबाबत दाखवले जाते तितकेच गांभीर्य या व अशा घटनांबाबतही दाखवले तरच ही लीग आपली प्रतिष्ठा जपेल. अन्यथा 2000 साली मॅच फिक्सिंग उजेडात आल्यावर भारतीय क्रिकेटबाबत घडले तेच आयपीएलबाबतही घडेल.