निमसाखर – वालचंदनगर येथील एका प्रकल्पामधून निमसाखरलगतच्या शेळगाव ओढ्यात रसायनमिश्रित काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी रात्रीत ओढ्यामध्ये सोडले जात आहे. हे रसायनमिश्रित ओढ्याच्या माध्यमातून पुढे नीरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे नीरा नदीतील जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.
निमसाखर हद्दीत असलेल्या शेळगाव ओढ्यालगत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी परिसरातील विविध कार्यकारी सोसायट्या व बॅंकांच्या माध्यमातून कर्ज काढून विहिरी खोदल्या आहेत. हे पाणी उपसा सिंचन योजना व ओढ्यातील पाझराचा फायदा बोअरवेलला होत पुढे पिकांना फायदा होतो. मात्र, या परिसरासह तालुक्यात जोमदार पाऊस झाल्याने निमसाखर हद्दीतील शेळगाव ओढा व नीरानदी दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र आहे. वाहत्या पाण्यात हात धुवुन घेण्यासाठी वालचंदनगर परिसरातील हा प्रकल्प सरसावला आहे. या कंपनीने ओढ्यात पाणी सोडले आहे.
सध्या पाऊस पडत असल्याने शेळगाव ओढ्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हीच संधी साधून रात्रीच्या वेळी रणगाव -निमसाखर रस्त्यालगतच्या चारीतून ओढ्यामध्ये रसायनमिश्रीत पाणी सोडले जात आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेलचे पाणी दूषित झाल्याने शेतकरी, जनावरे, शेतीची आरोग्य पत्रिका धोक्यात आली आहे. विहिरींमधील दूषित पाणी शेतीला वारंवार दिल्यास उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे.
यापूर्वी गेली तीन ते चार वर्षांपासून जोमदार पाऊस पडला नव्हता. मात्र, यंदा पाऊस जोरात झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत. एकीकडे ओला दुष्काळसदृष्य स्थिती असताना दुसरीकडे डिस्टिलरीसारखे प्रकल्प ओढ्याबरोबरच पुढे नीरा नदीत पाणी सोडून शेतकऱ्यांची वाट लावत आहेत.
अनेकवेळा रसायनमिश्रीत पाण्यामुळे नीरा नदीतील मासे, खेकडे, पक्षी यासह जलचर प्राणी मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रकल्पाविरोधात तक्रार करण्यास कुणी धजावत नाही. संबंधीताकडून दमदाटी करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे जनतेतून संताप उफाळला आहे. कंपनीचे मुकुंद घार्गे यांच्याकडून संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
निमसाखर येथील शेळगाव ओढ्यात पाणी : भूजपातळी दूषित
प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कानाडोळा
येथील औरंगाबाद डिस्टिलरी कंपनीकडून अनेक दिवसांपासून छुपके छुपके रात्रीतच प्रदूषित काळे, दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. असे प्रकार आजच घडले असे नाही तर अनेकवेळा असे प्रकार घडले आहे. वेळोवेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. याच मंडळाच्या काही अधिकाऱ्यांचे व प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांमधील कारभारामुळे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
वालचंदनगरलगतच्या एका प्रकल्पातून गेल्या काही दिवसांपासून प्रदूषित पाणी सोडले जात आहे. हे पाणी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून लेखी पत्र लवकरच पाठवणार आहे.
– संगीता लवटे, सरपंच निमसाखर.