पुणे – शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवरील शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याच्या सर्व्हरच्या तपासणीचे काम अद्याप “एनआयसी’कडून पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा आणखी दोन दिवस लांबणीवर पडली आहे.
शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी 1 लाख 23 हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थानी शिक्षक भरतीच्या जाहिरातीही अपलोड केल्या आहेत. आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोदंविण्याची प्रतीक्षा लागली आहे.
उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदण्यासाठी पोर्टलवर नवीन संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. यावर एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकदा प्रणाली सुरू झाल्यानंतर त्यात पुन्हा अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी त्याच्या तपासणीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.
सोमवारी (दि.13) प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली होती. मात्र त्यात काही अडचणी निर्माण झाल्यामुळे सुविधा सुरू करुन देण्यात आली नाही, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुविधा सुरू न झाल्यामुळे उमेदवारांकडून नाराजीची व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. संगणक प्रणालीच्या तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पोर्टलवर उमेदवारांना सूचना व मार्गदर्शनपर व्हिडीओ लोड करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत. प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना पोर्टलवर लॉगिन करता येणार आहे.