- अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत
कर्जत : अंत्योदय तसेच दारिद्रय रेषेखालील आणि एपील म्हणजे प्राधान्य गट यातील सर्वच लाभार्थीना स्वस्त धान्य विक्री दुकानात करोनाच्या काळात धान्य देण्यात आले. मात्र मागील दोन महिन्यांपासून एपील गटातील म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे या गटातील रेशनकार्ड धारकांची अवस्था दयनीय झाली आहे.
केशरी रेशन कार्ड धारक जेव्हा स्वस्त धान्य दुकानात जातात, तेव्हा गेल्या दोन महिन्यांपासून मालाचा पुरवठा होत नसल्याचे संबंधित कार्डधारकांना सांगण्यात येत आहे. केवळ अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांपुरतेच अन्नधान्य “वरून’ पुरविले जात असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
करोनाच्या काळात भल्याभल्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांची घडी विस्कटली आहे. त्यात या केशरी रेशनकार्ड धारकांची अवस्था काय वेगळी नाही. बंद पडलेले व्यवसाय, हातातून गेलेला रोजगार, पगारास होत असलेला विलंब आदी कारणामुळे या प्राधान्य गटातील कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत अन्ननागरी पुरवठा विभागाने या प्राधान्य गटातील म्हणजे केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य देणे बंद केल्याने या कार्डधारकांना वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना अडचणी येत आहेत.
शासनानानेच केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यांपासून घेतला आहे. त्यामुळे आता फक्त अंत्योदय आणि दारिद्रय रेषेखालील धारकांना स्वस्त धान्य पुरविले जात आहे.
– मिलिंद तंवर, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, कर्जत
आम्ही केशरी रेशनकार्ड धारक असलो तरी आम्ही सुद्धा सर्वसामान्य असून, आम्हालाही करोनाचा फटका बसला असून, आमची आर्थिक घडी विस्कटली आहे. परिस्थिती दयनीय आहे. जरी करोनाची संख्या कमी झाली असली तसेच सरकारने “अनलॉक’ केले असले तरी आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यास काही काळ जाईल. त्यामुळे जसे करोना काळात जसे धान्य दिले जात होते ते देण्यास पुन्हा सुरू करावे.
– शशिकांत वाडकर, केशरी रेशन कार्डधारक, कर्जत.