– जोसेफ तुस्कानो
आज मूलभूत विज्ञान एक प्रकारे अडगळीत पडल्यासारखे झाले आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाभिमुख करण्यासाठी सोपे, सहज समजणारे विज्ञानसाहित्य गरजेचे आहे. या साहित्याचे महत्त्व समजले तरच त्याचा प्रसार होऊ शकेल. साहित्य-संमेलनात पडणारा नवा पायंडा त्यास खचितच हातभार लावणारा ठरेल.
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाध्यक्षपदी ख्यातकीर्त ज्येष्ठ विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर विज्ञानसाहित्याच्या ऊर्जितावस्थेची चर्चा सुरू झाली आहे. प्रारंभीच्या काळात मराठी विज्ञान साहित्याची उपेक्षा होण्यामागची तीन कारणे सांगितली जात. एक म्हणजे, विज्ञान हा अवघड विषय आहे, हा सर्वसाधारण समज आणि विज्ञानसाहित्याच्या समीक्षेचे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही, असा गैरसमज समीक्षकांनी करून घेतला होता.
दुसरे म्हणजे, मराठीतले सुरुवातीचे विज्ञान साहित्य हे परभृत होते आणि संपूर्ण नावीन्यामुळे प्रकाशक-संपादकांचे त्याकडे लक्ष गेले नाही. तिसरे कारण, विज्ञान साहित्यात अन्य साहित्यप्रवाहाप्रमाणे अवतीभोवतीच्या वास्तवाचे चित्रण नसते; तर उद्याचे, परवाचे असते. विज्ञानकथांमध्ये तर आज अस्तित्वात असलेल्या विज्ञानाचे भविष्यातील प्रक्षेपण असते. या कारणास्तव विज्ञानसाहित्य प्रारंभीच्या काळात वाचकापर्यंत नीट पोहचले नाही. पण हे चित्र आता पालटत आहे.
हळूहळू परिस्थिती बदलली आणि विज्ञान साहित्यात विज्ञानकथा, कादंबऱ्या, माहितीपूर्ण लेख अशा विविध प्रवाहांची भर पडत गेली. पूर्वी पानभर कथा वा लेख छापून विज्ञानसाहित्याच्या तोंडाला पाने पुसणारे दिवाळी अंकांचे संपादक आता विज्ञानकथा आणि लेखांची आवर्जून मागणी करू लागले. त्यांचे मनोरंजक, माहितीपूर्ण आणि प्रबोधनात्मक विज्ञानलिखाण वाचकांच्या पसंतीस उतरू लागले.
डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, डॉ. अरुण मांडे, प्रा. माधुरी शानभाग यांसारखी दिग्गज मंडळी असूनही विज्ञान साहित्याची फारशी दखल घेतली जात नव्हती. या ज्येष्ठ साहित्यिकांचा यथोचित सन्मान होणे अगत्याचे होते. यंदा डॉ. नारळीकरांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून तो पायंडा पाडल्याबद्दल संबंधित महामंडळ अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी मनोरंजनासोबतच जागृती आणि प्रबोधन करणाऱ्या विज्ञान साहित्याला मराठी भाषेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची संधी साधली आहे. यामुळे मराठी समीक्षक विज्ञान साहित्याचे विश्लेषण करू लागतील आणि त्यामुळे समाजाला नितांत गरज असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन पसरण्यास खचित हातभार लागेल.
समाज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर निर्माण झालेल्या सोयी-सवलतींचा लाभ घेत असतो. अशा वेळी आपली मानसिकतादेखील वैज्ञानिक होणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा, उपयोजित विज्ञानाच्या बळावर अस्तित्वात येणाऱ्या सुखसोयींचा माणूस चंगळवादासाठी वापर करीत जातो आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगण्याचे भान विसरतो. अशा वेळी मूलभूत विज्ञानाचे कंगोरे लोकांपर्यत पोहचायला हवेत आणि हे काम विज्ञानसाहित्य करू शकते. पाणी, इंधने यांचा अवाजवी वापर टाळून आपण त्याची बचत करणे गरजेचे आहे व त्यासाठी वाहनाचा चंगळवाद टाळणे आवश्यक असते.
बचत म्हणजेच निर्मिती असते हे मूलभूत ज्ञान सामान्य माणसाच्या मनावर बिंबविण्याचे मोलाचे कार्य विज्ञानसाहित्य करत असते. सध्याच्या करोना काळात आपल्याला याचा वेळोवेळी प्रत्यय येत आहेच. सामान्य माणसे नाना प्रकारचे कर भरत असतात आणि आपण सरकार दरबारी भरलेल्या पैशाचे नेमके काय होते हे जाणून घेणे त्यांचा हक्क असतो. ही माहिती त्यांना विज्ञानसाहित्य पुरवू शकते.
आज समाजात साक्षरता वाढत आहे. त्यामुळे परंपरागत असलेल्या अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी विज्ञान साहित्याचा हातभार लागू शकतो. डॉ. नारळीकर एकदा म्हणाले होते, एकविसाव्या शतकातील विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो की, ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्चर्य आणि खेद दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्चर्य यासाठी की एकविसाव्या शतकातील माणूस हा प्रश्न विचारतोय आणि खेद यासाठी की विचारणारा भारतीय असतो.
अंधश्रद्धेच्या आहारी जाणारी आजची तरुण पिढी, दगड खाल्ला तरी पचवून दाखविण्याची आणि पाऊल टाकीन तिथे यश मिळविण्याची वृत्ती अंगी बाळगण्याऐवजी मानसिकदृष्ट्या हतबल होऊन प्रयत्न, कष्ट यांच्याऐवजी देवावर भर टाकते. दुर्बल मनाची ही तरुणाई आपल्या बुद्धीऐवजी अंगाऱ्यांवर, चिकाटीऐवजी पूजापाठांवर आणि श्रमाऐवजी बाबा-बुवांवर अवलंबून राहते आणि समाज दूरदर्शेच्या गर्तेत गटांगळ्या खात राहतो.
डॉ. नारळीकरांच्या अध्यक्षपदाच्या निवडीने मराठी विज्ञान साहित्यात नवे पर्व सुरू होईल अशी आशा करू या. सामान्य माणसाच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर विज्ञान-अक्षरे वारंवार गिरवली गेली तर त्यांच्यावर विज्ञान-संस्कार होतील आणि अंधश्रद्धांपासून मुक्ती मिळालेला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ल्यालेला नवा समाज निर्माण होईल, हा आशावाद उरी बाळगू या.
डॉ. जयंत नारळीकर म्हणतात त्याप्रमाणे “विज्ञान हा केवळ काही विचारवंताच्या अभ्यासाचा विषय राहिला नसून तो आपणा सर्वांच्या जीवनातला एक महत्त्वाचा घटक बनला आहे. सकाळी उठल्यापासून (जर घड्याळाच्या गजराने उठत असाल, तर त्या पूर्वीपासून!) रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत विज्ञानाचे पडसाद किती तऱ्हेने उमटतात, हे तुम्हीच पडताळून पाहा. म्हणजे विज्ञानाचा पसारा वाढत चाललाय, हेही तुमच्या ध्यानात येईल. या पसाऱ्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. मोठ्यांची मने पूर्वग्रहदूषित असतात तेव्हा मुलांवर त्यांच्या बालपणापासून विज्ञान-दृष्टीकोन बिंबवला पाहिजे, असेही त्यांना वाटते.
ती काही किचकट बाब नसून “तर्कनिरीक्षण आणि निष्कर्ष’ यांनी युक्त अशी प्रक्रिया होय. त्यासाठी विज्ञान-कथा, ललित-लेख, विज्ञान-कविता, कादंबऱ्या यांची आवश्यकता आहे. तसेच, या प्रकारच्या साहित्याची समीक्षकांनी आवर्जून दखल घ्यायला हवी. हे सारे घडण्यासाठी साहित्य संमेलनात विज्ञानसाहित्य आणि त्याशी निगडीत कार्यक्रमांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योजना व्हायला हवी. त्यानिमित्ताने, संशोधक तसेच विज्ञान लेखक यांचा जनसामान्य व विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकतो. त्यांचे कुतूहल शमविता येते.