अरुण गोखले
चातुर्मासाचा कालावधी साधारण जुलैचा मध्य ते ऑक्टोबरचा मध्य असा येतो. या सुमारास ऋतुमान परत्वे वर्षा आणि शरद हे ऋतूपाठोपाठ येत असतात. चातुर्मासात यासाठीच जैन साधू, साध्वी ह्या नियोजित स्थळी पोहोचत असतात. शारीरिक आणि मनोबल वाढवून घेण्यासाठी आपापली उपासना सुरू करतात.
शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यावरचे स्वास्थ्य कायम राहावे म्हणूनच उपवास, उपासना, आहाराचे नियम घालून दिलेले आहेत.
वर्षा ऋतूमधील सततचा पाऊस, आद्र हवा, हवेतला गारठा, ओलावा पावसाळ्यातील मळभ आलेले आकाश ह्याचा आपल्या आरोग्यावर अनुचित परिणाम होतोच.
या सुमारास मानवी शरीरातील कफ, वात आणि पित्त ह्यांचे प्रमाण हे साधारणपणे वाढलेले असते. भूकेचे प्रमाण मंदावलेले असते, तसेच पचनशक्तीही कमी झालेली असल्याने त्यास चातुर्मासाच्या निमित्याने घालून दिलेले उपवासांचे बंधन हे पूरक ठरते. उपवासाच्या निमित्याने दूध, फळे, दाणे, खजूर हे पदार्थ पौष्टिक आहेत.
खजूर हा रक्तवर्धक, लोहतत्त्व असलेला पदार्थ आहे. दूध, फळे मर्यादित सेवन केल्यास पचनास हलकी आणि हळूहळू पचनशक्ती वाढविण्यास मदत करणारी आहेत. या कालावधीत पाणी हा जीवनावश्यक घटक मोठ्या प्रमाणात दूषित होत असल्याने पाणी हे गाळून, उकळून नंतर थंड करून पिणे हेच हितावह ठरते. तसेच ह्या काळात पावसात भिजण्यामुळे होणारी सर्दी, ताप, खोकला असे लहानमोठे आजार यापासून बचाव होण्यासाठीही खाण्यापिण्याचे बंधन आपल्याच हिताचे आहे, हे विसरून चालणार नाही.
नारळी पौर्णिमेचा नारळी भात, कोजागिरीचे चंद्रप्रकाशातील दूध हे आरोग्यवर्धक आहे. असे दूध हे शक्तिवर्धक आणि पित्तनाशक किंवा पित्तशामक आहे.
माणसाच्या शारीरिक आरोग्य स्वास्थ्याबरोबरच मानसिक आरोग्यसुद्धा उल्हासित राहण्यासाठीच काही व्रते, पूजा, उत्सव यांचेही खास आयोजन याच कालावधीत केलेले आहे. उदा., गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्र यासारखे सामाजिक सणोत्सव हे मानवी मनात आनंद, उत्साह व एक सामाजिक चैतन्य जागृत करतात.