मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य कलाकार रवी पटवर्धन यांचे नुकतेच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने 6 डिसेंबरला रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या 26 जानेवारीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वारजे शाखेने स्नेहमेळावा व तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना 83 वय असलेल्या पटवर्धनांचे खणखणीत आवाजातील भाषण एखाद्या तरुणाला लाजवेल असे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते, “आजचा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा झाला, माझ्यासारख्या कलाकाराला रंगमंचावरून थेट अशा भव्य दिव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बसवले हा माझा सन्मान समजतो.’ यात त्यांचा नम्रपणा दिसून आला होता. कार्यक्रमासाठी चारचाकीने ते मुंबईवरून मुद्दाम आले होते. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारताना मुंबई ते पुणे प्रवासाच्या दगदगीचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. याचं रहस्य काय, असा प्रश्न मी विचारला होता. तेव्हा सकारात्मक वृत्ती,अभिनयावरचं प्रेम आणि त्यामुळे मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम हे माझ्या आरोग्याचे इंगित असल्याचं ते बोलले होते.
रवी पटवर्धन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना मिळालेल्या “गावचा पाटील’, पोलीस आयुक्त’, “न्यायाधीश’ किंवा खलनायकी प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांद्वारे ते घराघरांत पोचले. त्यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटकांत, तर मराठी व हिंदी अशा 200 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या नाटक, चित्रपट व छोट्या पडद्यावरील जवळपास सर्वच भूमिका लक्षणीय व अविस्मरणीय होत्या. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे प्रचलित म्हण आहे. या म्हणीचे प्रत्यंतर आपल्याला रवी पटवर्धन यांच्या बाबतीत आल्याचे दिसते. 1944 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. अशा दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला हे त्यांचे भाग्य होतेच, पण या संधीचे त्यांनी सोने केले हे जास्त महत्त्वाचे.
“आरण्यक’ हे नाटक पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर वयाच्या 82व्या वर्षांतही याच नाटकात ते धृतराष्ट्राची भूमिका करत होते. करोना काळात चित्रीकरणावर बंदी आली. त्यामुळे मालिकांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर दोन-तीनदा पटवर्धन व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यामातून मालिकेत दिसून आले होते. त्यांच्या वयामुळे ते चित्रीकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले व शंकराचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत पटवर्धन पहिले आले होते. पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बॅंकेत नोकरी करत होते. बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकांची हौस भागवता आली, याचा ते नेहमी उल्लेख करीत असत.
नाटके
अपराध मीच केला
आनंद (बाबू मोशाय)
आरण्यक (धृतराष्ट्राची भूमिका)
एकच प्याला (सुधाकरची भूमिका)
कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान)
कोंडी (मेयरची भूमिका)
जबरदस्त (पोलीस कमिशनर)
प्रेमकहाणी (मुकुंदा)
बेकेट (बेकेट)
भाऊबंदकी
मला काही सांगायचंय (बाप्पाजी)
मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)
विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर)
मराठी चित्रपट
अशा असाव्या सुना
उंबरठा
दयानिधी
संत भगवान बाबा
ज्योतिबा फुले
बिनकामाचा नवरा
सिंहासन
हरी ओम विठ्ठला
हिंदी चित्रपट
अंकुश
झॉंझर
तक्षक
तेजाब
नरसिंह
प्रतिघात
हमला
दूरदर्शन मालिका
“अग्गंबाई सासूबाई’ ही झी मराठीवरील मालिका. यात ते आतापर्यंत काम करीत होते. या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फारच कमी वेळात रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. लाडावलेल्या सोहमला धाकात ठेवणारे आजोबा आणि नातवाला “सोम्या, कोंबडीच्या’ अशा गावठी विशेषणांनी संबोधणारे “दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ या भूमिकेतील रवी पटवर्धन रूपातील अजोबांवर अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं.
“आमची माती आमची माणसं’ (शेतकऱ्यांसाठीचा सह्याद्री वाहिनीवरील दैनिक मराठी कार्यक्रम), तेरा पन्ने, महाश्वेता, लाल गुलाबाची भेट याही मालिका लक्षात राहाण्यासारख्या होत्या. अशा या चतुरस्त्र अभिनेत्याला विनम्र अभिवादन.
अभिवादन
वृषाली पंढरी