पुणे शहरातील एक महत्त्वाचे व जुने मंदिर म्हणजेच चतुःशृंगी मंदिर. सेनापती बापट रोड वर असलेले हे मंदिर नवरात्रात खूप गजबजलेले असते. टेकडीवर सुमारे 160 पायऱ्या चढून गेल्यावर आपण चतुःशृंगी देवीच्या देवळात पोचतो. देवळाकडे जाताना काही पायऱ्यांवरच एक गणपतीचे मंदिर लागते. विविध खांबांवर कोरलेले अष्टविनायक तसेच फुले व पानांच्या सुंदर नक्षीने हे मंदिर सुशोभित आहे. गणपतीचे दर्शन घेऊन पुढील पायऱ्या चढून आपण देवीच्या देवळात पोचतो.
देवळाची आख्यायिका : दुर्लभशेट म्हणून पेशवेकाळात सावकार होते. त्यांच्याकडे नाणी पाडण्याचा, टांकसाळीचा मक्ता होता. ते सप्तशृंगी देवीचे परम भक्त होते. दर वर्षी न चुकता ते वणीला चैत्रयात्रेला, सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असत. कालपरत्वे वयोमानामुळे त्यांना यात्रा आणि प्रवास शक्य होणार नाही असे लक्षात आले. त्यामुळे ते अतिशय अस्वस्थ झाले.
एका रात्री देवीने त्यांना स्वप्नामध्ये दर्शन दिले व मी या टेकडीवर असून माझे इथेच दर्शन घेता येईल असा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे दुर्लभशेटने इथे टेकडीवर खोदकाम केले असता स्वयंभू रूपातील मूर्ती आढळून आली. त्यांनी या मूर्तीची स्थापना केली व मंदिर बांधले. त्या नंतर वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला व त्याला आज असलेले रूप प्राप्त झाले. या मंदिराचे व्यवस्थापन, पूजा-अर्चा गेली अनेक वर्षे वंशपरंपरेने अनगळ कुटुंबीयांकडे आहे.
नवरात्रोत्सव : नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापने नंतर देवीची विधिवत पूजा होते.लघुरुद्र, महापूजा व आरती केली जाते. चांदीच्या मखरात बसलेल्या, मोत्याची नाथ घालून सजलेल्या देवीचे हे रूप खूपच मनोहारी दिसते.
दर वर्षी नवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. देवीच्या दर्शनाला हजारे भाविक लोटतात. रोज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नवमीला नवचंडी याग सुरु होतो व दसऱ्याला त्याची सांगता होते. दसऱ्याला देवीची छबिना किंवा पालखी सीमोल्लंघनासाठी निघते. देवीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येते. परिसराला एक फेरी मारून परत देवी देवळात आणली जाते.
नवरात्रातील जत्रेसंदर्भात जुने वैशिष्ट्य सांगितले जाते. सुमारे 60-70 वर्षांपूर्वी पुण्यातील वेगवेगळ्या तालमीतील पहिलवान मध्यरात्री देवीला फुलांची माळ अर्पण करायला पळत पळत जात असत.याला दौड असे म्हणत. नवरात्रातील त्या दिवसाप्रमाणे जी माळ असेल उदा.पाचवी, सहावी त्याप्रमाणे माळा एका काठीला लावून लहान मोठे पहिलवान दौडत जात असत.
आजही देवीच्या दर्शनाबरोबरच रोज व्यायामाला इथे येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ व रमणीय आहे. रोज सकाळी साडे सहा ते रात्री साडे आठ पर्यंत मंदिर उघडे असते तर दर मंगळवारी रात्री बारापर्यंत भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येतो.