मुंबई – ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे प्रमुख पार्थो दासगुप्ता यांच्याशी व्हॉट्स ऍप चॅटवर बालाकोट हवाई हल्ल्याशी संबंधित दिलेल्या माहितीवरून राज्य सरकारला अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गोपनियता कायद्याच्या भंगाची कारवाई करता येईल का? याबाबत सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्याच बरोबर ही संवेदनशील माहिती गोस्वामी यांना कशी मिळाली, याचे उत्तर केंद्राने द्यावे, असे आव्हानही देशमुख यांनी दिले.
प्रत्यक्षात बालाकोट हल्ल्याआधी तीन दिवस अर्णब यांनी ही माहिती व्हॉट्स ऍप चॅटवर दिली आहे. ही माहिती अन्य वेळी केवळ पंतप्रधान, संरक्षण मंत्री, लष्कर प्रमुख, आणि काही मोजक्या लोकांना माहिती असते, अशी एवढी संवेदनशील माहिती गोस्वामी यांना कशी मिळाली, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, असे देशमुख म्हणाले.
सरकारी गोपनियता कायदा 1923 नुसार गोस्वामीवर कारवाई करता येते का याची माहिती राज्य सरकार घेत आहे. दरम्यान कॉंग्रेसने गोस्वामी याच्या या चॅटच्या निषेधार्थ रिपब्लिक टिव्हीच्या कार्यालयापुढे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.