कार्ला – गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खोळंबलेली भातलावणी सुरू झाली असून, नाणेमावळातील भाजे या गावात मावळ कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार प्रथमच चारसूत्री लागवड करण्यात आली आहे.
भाजे येथील प्रगतीशील शेतकरी नंदकुमार पदमुले यांच्या शेतात उपविभागीय कृषी अधिकारी (पुणे) सुनील खैरनार, मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मंडल कृषी अधिकारी धेंडे, कृषी पर्यवेक्षक कुंभार, कृषी सहायक एस. जी. शिंदे, पी. ए. हांडाळ, कृषीमित्र कल्पेश आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली.
पदमुले यांनी रोपे 21 दिवसांची होताच चारसूत्री पद्धतीने भातलागवड केली. त्यांनी दोन एकर क्षेत्रासाठी 16 किलो बियाणे बीजप्रक्रिया करुन रोपवाटिकेवर भात रोपे तयार केली. योग्य वयाच्या रोपांची लागवड केली व नंतर युरिया ब्रिकेटच्या गोळ्या चार चुडामध्ये एक गोळी अशा प्रकारे दोन दिवसानंतर लावणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे पदमुले यांचे निसर्गचक्री वादळाने याच शेतात शेवगा व पपईचे नुकसान झाले होते, तेथेच त्यांनी हे अंतरपीक घेतले आहे.
चारसूत्री पद्धतीने भातरोपे कमी लागतात. भातलावणींना वेळ देखील कमी लागतो. बियाणे कमी लागल्याने खर्च कमी युरिया ब्रिकेटमुळे तनाचा प्रादुर्भाव कमी व भाताच्या उत्पादनात तीन ते चार पटीने वाढ होते; तरी सर्वांनी चारसूत्री पद्धतीचा अवलंब करावा.
– नंदकुमार पदमुले, प्रगतीशिल शेतकरी, भाजे.