नगर – राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नगर केंद्रावर मोठा गोंधळ झाला. “मी पण नथूराम गोडसेच बोलतोय…’ या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखविल्याचा दावा करीत सावरकरप्रेमी चांगलेच चिडले. त्यामुळे नाटक संपण्याच्या तयारीत असतानाच सावरकरप्रेमींनी सभागृहात उभे राहून, “हे नाटक बंद करा’ अशी घोषणाबाजी करीत नाटक बंद पाडले.
61वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून नगर केंद्रावर सुरू झाली. उल्हास नलावडे लिखित व दिग्दर्शित “मी पण नथूराम गोडसेच बोलतोय…’ हे नाटक नगरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे पहिल्या दिवशी सादर झाले. या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांची चुकीची प्रतिमा समोर आणण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला.
काही सावरकरप्रेमींनी सभागृहात उभे राहून, “हे नाटक बंद करा’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शहरातील इतर हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती देण्यात आली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ माऊली संकुल सभागृहात धाव घेतली. त्यामुळे गोंधळ उडाला. तणाव निर्माण झाल्यामुळे माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ठाम राहिले. त्यांनी रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नाटकानंतर स्वतःच्या भावना व्यक्त करताना या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असून, अशा नाटकाचे प्रयोग राज्यात पुन्हा कुठेही होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी राज्य नाट्य स्पर्धेतील नगर केंद्रावर वाद झाल्याने पुन्हा एकदा नगर केंद्र चर्चेत आले आहे.
नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानने राज्य नाट्य स्पर्धेत “मी पण नथूराम गोडसेच बोलतोय…’ हे नाटक सादर केले. मात्र, या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथूराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकरप्रेमींनी केला. नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभे राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली.
तसेच जोरदार घोषणाबाजी करत हे नाटक सादर करणाऱ्या कलाकारांचा, दिग्दर्शकांचा व स्पर्धेच्या आयोजकांचा निषेध केला.काही ज्येष्ठ रंगकर्मी यांनीदेखील या नाटकात चुकीचा इतिहास दाखवल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्यावरही दोन रंगकर्मींच्या गटांमध्ये बाचाबाची झाली. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडला.
मात्र, या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असल्याचे सावरकरप्रेमींतर्फे उत्कर्ष गीते व अमोल हुबे पाटील यांनी सांगितले.
योग्य ती कारवाई करणार : मुनगंटीवार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्याच्या भावना दुखविण्याचा कोणालाही अधिकारी नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी जर “मी पण नथूराम गोडसेच बोलतोय…’ या नाटकात अपशब्द वापरले असतील, तर माहिती घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.