मुंबई – शहरांची नावे बदलण्याची बाब केंद्राच्या अखत्यारीत आहे, राज्य सरकारला त्यात काहीही निर्णय घेता येत नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी शिवसेना पहिल्यापासून आक्रमक राहिली आहे. तथापि आता केवळ सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेने हा विषय सोडून दिला आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की हा विषय आमच्या हातात नाही. विभागीय आयुक्तांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. 4 मार्च 2020 ला हा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. या विषयात असलेली कायद्याची गुंतागुंत लक्षात घेऊन त्यावर विधी विभागाचा सल्ला मागण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या घेऊन हा विषय केंद्र सरकारकडे संमतीसाठी पाठवला जाईल असे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.