दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार जगात सर्वत्र मातृदिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याप्रमाणे कालच्या रविवारीही भारतासह सर्वत्रच विविध प्रकारे हा दिवस साजरा केला गेला. आता आणखी दोन दिवसांनी जागतिक कुटुंब दिवस साजरा होणार आहे. सोशल मीडिया आणि इतरत्रही या दिवसाचे कर्मकांड पार पाडले जाईल. दरवर्षी मातृदिनानंतर लगेचच येणारा कुटुंब दिवस बरेच काही सांगून जात आहे. जगात मातृदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच विविध ठिकाणी घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली तर हे सर्व दिन आणि दिवस फक्त कर्मकांड म्हणूनच शिल्लक राहिल्याचे वास्तव समोर येत आहे.
वयोवृद्ध आई-वडिलांच्या सततच्या आजारपणामुळे आणि त्यांना सांभाळण्याच्या अटीमुळे प्रत्येकवेळी लग्नासाठी नकार मिळाल्याने पुण्यातल्या तरुणाने नैराश्यातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची मागणी केली आहे. हा 37 वर्षांचा अविवाहित तरुण आर्थिक स्थितीमुळे निराश झाला होता. लग्नाचे प्रयत्न सुरू असतानाही आईवडिलांची सेवा करणारी जोडीदारही मिळत नाही म्हणून निराश होऊन त्याने इच्छा मरणाची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेऊन या तरुणाचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले असले तरी या निमित्ताने एक वेगळा विषय समोर आला आहे.
समुपदेशनामुळे या तरुणाचा जीव वाचला; पण काहींना जीव गमवावे लागले. मुंबई परिसरातही अशीच एक घटना घडली आहे. नैराश्यातून आई आणि मुलगा यांनी विष पिऊन आत्महत्या केली. उदयोन्मुख क्रिकेटपटू असलेल्या या मुलाला आणि त्याच्या आईला आर्थिक परिस्थितीमुळे मरण पत्करावे लागले असा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीतही एक वकील आणि त्याच्या आईने अशीच एकाचवेळी आत्महत्या केली होती. यापेक्षा अगदी वेगळी घटना सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात घडली. अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या दहा वर्षाच्या पोटच्या मुलाचा आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून खून केल्याची ही घटना आहे.
“माता न तू वैरिणी’ या काव्य पंक्तीला शोभणारेच हे कृत्य मानावे लागत आहे. मातृदिन साजरा झाला असताना आणि कुटुंब दिन साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच या घटना समोर आल्याने एक वेगळीच सामाजिक समस्या अधोरेखित होत आहे. पुण्यातील तरुणाला आईवडिलांना सांभाळणारा जोडीदार मिळत नाही म्हणून इच्छामरणाची मागणी करावी लागते. हा विषय दिसतो तेवढा साधा नाही. कारण आता सामाजिक परिस्थिती बदलली आहे आणि या बदलांचे भान किंवा जाणीव नसलेल्या समाजघटकांना निराश व्हावे लागत आहे. आईवडिलांची काळजी घेण्यासाठी लग्न करणे हा विचार आता जुना झाला असून नवीन पिढीला तो पटत नाही.
लग्नाच्या वाटाघाटी सुरू असतानाच स्वतंत्र राहण्याचे खुले नियोजन करणारी ही पिढी आहे. ज्या घरात फक्त एक मुलगीच आहे किंवा सर्वच मुली आहेत त्या घरातही या मुली लग्नानंतर आपल्या आईची काळजी घेण्याची किंवा आईला दरमहा आर्थिक मदत करण्याची अट आता घालू लागल्या आहेत आणि बदलत्या परिस्थितीत त्यात चुकीचे काहीच नाही. पूर्वीप्रमाणे पतीने कमवायचे आणि पत्नीने घर सांभाळायचे ही कल्पना आता अस्तित्वात राहिलेली नाही. मुलींनाही करिअर करायचे असल्याने त्यांना अशा प्रकारची कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे शक्य होत नाही. सकाळी नोकरीवर जाताना मुलांना डे केअर सेंटर किंवा पाळणाघरात सोडून जाणाऱ्या आधुनिक पतीपत्नी यांना घरातील इतर माणसांची जबाबदारी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अशी जबाबदारी नाकारणे यामागे संपूर्णपणे व्यावहारिक दृष्टीकोन आहे आणि तो मान्यच करावा लागणार आहे.
सुदैवाने आधुनिक काळात ज्येष्ठांची काळजी घेणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. घरी येऊन ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जाते. विरंगुळा केंद्रे सुरू झाली आहेत. काही सामाजिक संस्थाही असे काम करीत आहेत. वृद्धाश्रम हा अगदीच नको वाटणारा टोकाचा पर्याय असल्याने घरातच आईवडिलांची काळजी घेणे आता शक्य आहे आणि नवीन पिढीने तो पर्याय मनापासून स्वीकारायला सुरुवात केली आहे. साहजिकच आईवडिलांची काळजी घेणारे कोणी नाही म्हणून निराश होऊन आत्महत्येचा पर्याय शोधण्याची काहीच गरज नाही. 15 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने ही बदलती स्थिती सर्वांनीच लक्षात घ्यायला हवी. सर्व कुटंबाने एकत्र राहावे हा आदर्श विचार असला तरी हा विचार प्रत्यक्षात येणे अनेकवेळा शक्य नसते.
विविध कारणांनी कुटुंबे विभक्त होतात आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न तयार होतो; पण आता या प्रश्नालाही उत्तरे मिळू लागली आहेत आणि नवनवीन पर्याय तयार होऊ लागले आहेत. त्या पर्यायांचा स्वीकार करणे म्हणजेच काळासोबत जाणे हे वास्तवही समजून घेण्याची गरज आहे. विविध समाजशास्त्रज्ञांनीही आता हे वास्तव लक्षात घेतले आहे. भारतासारख्या परंपराप्रिय आणि रूढीप्रिय देशात समाजरचनेतील हे बदल सहजासहजी पचनी पडणारे नसले तरी व्यावहारिक अपरिहार्यतेमुळे हे बदल लक्षात घ्यावेच लागणार आहेत.
वरील पुण्याच्या उदाहरणात या तरुणाला जोडीदार हवा आहे की आई-वडिलांना सांभाळणारी नोकर, असा प्रश्न समाज माध्यमांमध्ये विचारला जात आहे. हे लक्षात घ्यायला हवे की विवाह आणि कुटुंब या सर्वच संकल्पनांच्या परिभाषा आता बदलू लागल्या असल्याने त्या बदलांप्रमाणेच व्यवहार ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात फक्त तरुणांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचेच समुपदेशन करावे लागणार आहे. कुटुंबातील माता असो किंवा पिता अथवा मुलगा असो किंवा सून प्रत्येकाचीच जबाबदारी आणि कर्तव्ये यांची बदललेली परिभाषा संपूर्ण कुटुंबानेच समजून घ्यावी लागणार आहे. म्हणजे कोणाच्याच पदरी निराशा येणार नाही आणि कौटुंबिक व्यवहारही सुरळीत सुरू राहतील.