विलास कदम
देशातील पशूंच्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, ज्या जनावरांची उपयुक्तता कमी झाली आहे, त्यांची संख्याही घटत चालली आहे. केवळ आवड म्हणून कोणीही जनावरे पाळणार नाही. ओझे वाहून नेण्यासाठी उपयुक्त असलेल्या खेचरे, गाढवे, उंट आदी जनावरांची संख्या कमी होत चालली असून, पर्यायी वाहतूक साधनांमुळे प्रदूषणही वाढत आहे. म्हणजेच एका बाजूला वाढते प्रदूषण तर दुसरीकडे निरुपयोगी ठरलेल्या प्राण्यांचे संरक्षण असे दुहेरी आव्हान सरकारसमोर आहे.
पशुपालन विभागाच्या वतीने देशातील पशूंची जी गणना करण्यात आली, तिचे निष्कर्ष पाहता उंट, घोडे यांसारख्या पाळीव जनावरांची संख्या वेगाने घटून जवळजवळ निम्म्यावर आल्याचे दिसून येते. दुसरीकडे गायी, बैल, मेंढ्या, शेळ्या अशा पाळीव जनावरांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. प्राण्यांच्या घटत्या संख्येचा सर्वाधिक फटका गाढवांना बसला आहे. 2012 मध्ये देशात एकंदर 3.20 लाख गाढवे होती. 2019 मध्ये ही संख्या निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. त्याचप्रमाणे खेचरे आणि तट्टूही संख्येने अत्यल्प उरले आहेत. वन्यजीवांमध्ये वाघांची संख्या 12.3 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. पशूंच्या संख्येत होत असलेली वाढ अथवा घट यांची कारणे शोधायची झाल्यास काही बदल आपल्याला स्पष्टपणे जाणवतात.
काश्मीरसारख्या डोंगराळ प्रदेशात सामानाची वाहतूक करण्यासाठी सर्वाधिक उपयोग गाढवे आणि खेचरे यांचाच होत असे. खेचर ही घोड्याचीच एक प्रजाती मानली जाते. परंतु काश्मीरमध्ये आता रेल्वे सुविधेचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानसेवाही वाढल्या आहेत. साहजिकच खेचरे आणि गाढवांची उपयुक्तता कमी झाली असून, माणसांसाठी ही जनावरे निरुपयोगी ठरत आहेत.
एके काळी घोड्यांची उपयुक्तता गाढवांपेक्षा अधिक होती. पोलीस आणि सैन्यदलांतही घोड्यांचा वापर होत असे. प्रवासी वाहतुकीसाठी टांग्यासारखी वाहने आणि मालवाहतुकीच्या गाड्यांमध्येही ओझे ओढण्यासाठी घोड्यांचा उपयोग होत असे; परंतु आता प्रवासी आणि मालवाहतुकीची यांत्रिक साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आणि त्या साधनांचा झपाट्याने विस्तार झाल्यामुळे दोन्ही बाबतीत घोडे निरुपयोगी ठरले आहेत. मोटारसायकलींचा वापर आता केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच नव्हे तर मालवाहू वाहन म्हणूनही केला जात आहे. दुसरीकडे, केवळ घोडेच नव्हे तर कोणतेही जनावर पाळणे आता पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. कारण त्यांचे उपयोगिता मूल्य घटले आहे आणि पालनपोषणाचा खर्च मात्र वाढला आहे. हरभरा हे घोड्यांचे प्रमुख खाद्य मानले जाते आणि तो अत्यंत महागडा ठरत आहे. चराऊ कुरणांची संख्या घटत चालली आहे. पशूंना खाऊ घालण्यासाठी ज्या भुशाचा वापर केला जातो, त्याचेही दर बरेच वाढले आहेत.
गाढव हा तर असा प्राणी आहे, ज्यावरून आपल्याकडे विविध साहित्यकृती रचण्यात आल्या आहेत. मूर्ख माणसाला उद्देशून गाढवाचे उदाहरण देण्यासाठी म्हणी आणि वाक्प्रचारांचीही आपल्याकडे कमतरता नाही. देशाच्या अनेक भागांत गाढवावर बसून जाणे अपमानास्पद मानले जाते. एखाद्याचा अपमान करण्यासाठी त्याची गाढवावरून धिंड काढण्याचीही प्रथा आपल्याकडे होती. अर्थात, अनेक समाजांमध्ये आजही गाढवे सामान वाहून नेण्याबरोबरच स्वारीसाठीही उपयुक्त मानली जातात. मात्र, गाढवांच्या पालनपोषणाचा खर्च जमेस धरता त्यापेक्षा कमी खर्चात अनेक यांत्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अशा स्थितीत वापराविना गाढवे केवळ दारात उभी करण्यासाठी कोण पाळणार?
वाहनांमुळे समस्याही निर्माण झाल्या आहेत. घोडे आणि गाढवांसारखे प्राणी प्रदूषणमुक्त होते, तर मोटारगाड्यांपासून विमानांपर्यंत सर्व वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर धावत असल्यामुळे त्यातून प्रचंड प्रदूषण निर्माण झाले. वातावरणात धूर ओकणाऱ्या या वाहनांमुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कैक पटींनी वाढले. पशूंच्या संख्येच्या बाबतीत केवळ काश्मीरमध्येच नव्हे तर राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्येही घट झाल्याचे आढळले आहे. परंतु पशूंच्या तुलनेत लोकसंख्येचा विचार केल्यास स्वातंत्र्याच्या वेळी देशाची लोकसंख्या 35 कोटी होती ती आज 131 कोटी झाली आहे.
सायकलरिक्षात एका व्यक्तीने बसायचे आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याचे ओझे ओढायचे, हे एके काळी अमानवी मानले जात असे. त्यामुळे अशा पर्यायी व्यवस्थेवर भर दिला जात असे, जी कमी खर्चिक असेल. सायकलरिक्षांचा जमाना अनुभवलेला आपला समाज आज बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांचे युग पाहात आहे. मात्र, सायकलरिक्षा चालकांमध्ये बेकारी वाढली आहे. तरीही समाजाला मागासपणातून मुक्त करायचे असेल तर प्राचीनतेचा मोह टाळून नव्या साधनांकडे घेऊन जावेच लागेल.
पिढी नव्या अपेक्षांनुरूप सुविधाजनक साधने शोधून काढणार आणि त्यांचा स्वीकार करणार, हे उघड आहे. हा विचार आपण पशूंच्या संख्येशी, संरक्षणाशी आणि नियंत्रणाशी जोडल्यास आपल्या लक्षात येईल की, ज्या जनावरांची उपयोगिता घटेल, त्या जनावरांना पाळण्यामागील प्रेरणाही अपरिहार्यपणे घटणारच. गायींची संख्याही अनेक राज्यांमध्ये घटली आहे; परंतु गायी दूध उत्पादनासाठी उपयुक्त असल्यामुळे देशी गायींऐवजी संकरित गायी का होईना, पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु दूध न देणाऱ्या ज्या भाकड गायींना अनुपयुक्त म्हणून खुंट्यावरून सोडून दिले जाते, अशा गायींची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे नवीन समस्या निर्माण होत आहेत. अशा मोकाट गायींपासून पिकांचे संरक्षण करणे अवघड बनले आहे. निरुपयोगी पशूंचे संरक्षण कसे करायचे, हा प्रश्न उग्र बनत जाणार आहे. तात्पर्य, ही समस्या आधुनिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेली असून, त्याचे निराकरणही याच व्यवस्थेला करावे लागणार आहे.