बदललेल्या मतदान केंद्रांची दखल घेण्याचे मतदारांना आवाहन
पिंपरी – चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असून निवडणूक आयोगाच्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे. मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आधी जागे अभावी मावळ मतदारसघांतील पिंपरी-चिंचवड शहरात येणारी मतदान केंद्रे ही बदलण्यात आली आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने एक जाहीर पत्रक काढले असून त्यामध्ये आठ बदललेल्या मतदान केंद्राची नावे आहेत. या बदलाचा मतदारांनी दखल घेत योग्य मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मतदान केंद्र क्रमांक 16 ते 18 हे निगडी येथील महापालिकेच्या मुलांच्या शाळेतील मतदान केंद्र महापालिकेच्या मुलींची शाळा क्रमांक एक येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याच बरोबर 145 व 153 ही मतदानकेंद्रे चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील कमलानेहरू पार्क प्राथमिक शाळा येथून पुणे-मुंबई महामार्गालगतच्या दर्शन अकादमी शाळा एम्पायर इस्टेट फेज एक येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. तर 149 व 151 ही मतदान केंद्रे कमला नेहरू प्राथमिक विद्यालयातून ते चिंचवड रेल्वे स्थानका जवळील महात्मा फुले शाळा क्रमांक एक (बहिरवाडे) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
तसेच 146, 150, 152, 154, 156 व 158 ही मतदान केंद्रे ही चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले शाळा क्रमांक 2 येथून थेट बॅडमिंटन हॉल एमआयडीसी ऑफिस चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच 178 ते 183 ही मतदान केंद्रे लोकमान्य मेडिकल फाऊंडेशन होमियोपॅथिक कॉलेज चिचंवड येथून ते ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल चिंचवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
214 हे मतदान केंद्र महापालिकेच्या प्राथमिक शाळा भाटनगर येथून ते शिलाबाई साबळे समाजमंदिर भाटनगर येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. 225 ते 230 ही मतदान केंद्रे आर्य समाज शाळा पिंपरी येथून जयहिंद प्रायमरी स्कूल पिंपरी कॅम्प येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 280 ते 283 ही मतदानकेंद्रेही जय हिंद हायस्कूल पिंपरी येथून ती मंघनमल उधाराम कॉमर्स कॉलेज पिंपरी कॅम्प येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसावर मतदान आले असताना ऐनवेळी हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. वोटर स्लीपचेही वाटप करण्यात आले आहे. मात्र निवडणूक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
मतदारांना सर्वोतपरी मदत ही प्रशासनाच्या वतीने केली जाणार असल्याचेही सांगितले. एकीकडे यावेळी शेजारील लोकसभा मतदार संघांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरलेली असताना ऐनवेळी मतदान केंद्रात बदल करण्यात आले आहेत. सलग चार दिवसांपासून शहरात तापमान 40 अंशांच्या पुढे जात असल्याने याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात अशा उन्हाळ्यात मतदान केंद्र सापडले नाही, म्हणून मतदार मतदान न करता परत जाण्याचीही भीती आहे.