नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीबाबतच्या आकड्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. सध्याची घसरलेली आर्थिकस्थिती लपवण्यासाठी मोदी सरकारने हा प्रताप केल्याचाही त्यांनी हल्लाबोल केला आहे.
वल्लभ यांनी असा दावा केला की, सरकारी आकडेवारीनुसार दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर 7.5 टक्के आहे. मात्र ज्या आधारावर हा वृद्धीदर काढला आहे त्यात अनेक नवीन बाबी जोडल्या गेल्या आहे.
त्यामुळे आकड्यांमध्ये फेरफार करून हा वृद्धीदर दर्शविला आहे. जर पहिल्या तिमाहीतील आकडे आणि दुसऱ्या तिमाहीतील आकड्यांची तुलना केली तर यात 10 टक्क्यांचा फरक दिसतो.
सरकारने आकड्यांमध्ये फेरफार करण्याऐवजी उपभोगावर जास्त भर देण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे बाजारात मागणी वाढेल. यामुळे देशाचे भले होईल, असेही वल्लभ यांनी म्हटले.