जळोची : अनेक दिवस बारामती शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून न आल्याने प्रशासनाने काही नियम व अटीं वरून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातील बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी दिली होती. व्यापाऱ्यांनी वेळ वाढवून मागितल्याने पुन्हा सायंकाळी सात पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
मात्र आज एकदम ५ कोरुना बाधित रुग्ण आढळून आल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने बाजारपेठा सुरू ठेवण्याच्या संदर्भात वेळेत बदल केला आहे. त्यानुसार उद्यापासून दि ५ पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत.
बारामतीत कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून ‘बारामती पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘बारामती पॅटर्न’ ची चोख अंमलबजावणी केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास यश मिळाले. हा पॅटर्न राबवण्यासाठी राज्यशासनाच्या सर्व विभागांबरोबरच बारामती नगरपालिकेचाही महत्वाचा सहभाग होता.
बारामती नगरपालिकेचे नगरसेवक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांचाही यात मुलाचा वाटा होता. या सर्वांमुळे बारामतीत कोरोनाला थोपविण्यात यश मिळालेे होते. त्यानंतर प्रशासनाने काही नियम व अटी शिथिल करून बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन न केल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.