नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून तुरळक ठिकाणी करोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या नियमांत मोठा बदल केला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांना करोना लसीसंदर्भातील स्वयंघोषणा अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. करोना संसर्गात सातत्याने होत असलेली घट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना यापुढे एअर सुविधा पोर्टलवरील करोना लसीसंदर्भातील अर्ज भरणे बंधनकारक नाही. लसीसंदर्भातील स्वयंघोषणा अर्ज तूर्तास बंद करण्यात येत आहे. मात्र आगामी काळात करोना संसर्गाची स्थिती पाहता हा अर्ज भरणे बंधनकारक केले जाऊ शकते.
मागील काही दिवसांपासून करोना संसर्गात सातत्याने घट होत आहे. तसेच भारत आणि जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरणात लक्षणीय वाढ झाली. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमांत हा बदल करण्यात आला आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याआधी हवाई प्रवासाच्या माध्यमातून भारतात यायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर करोना प्रतिबंधक लसीसंदर्भातील फॉर्म भरणे बंधनकारक होते. यामध्ये प्रवाशांना त्यांनी लस घेतलेली आहे की नाही, लसीचे किती डोस घेतलेले आहेत, अशी माहिती भरावी लागत होती.
मागील आठवड्यात हवाई वाहतूक मंत्रालयाने हवाई प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारनक नसल्याचे जाहीर केले होते. मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन हवाई मंत्रालयाने केले होते. याआधी हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक होते.