पुणे : शहरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस तसेच प्रशासनाकडून अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, ही अंमलबजावणी करताना अत्यावश्यक वस्तूसाठी सकाळी 10 ते 12 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून ज्येष्ठ नागरिकांनाही वाढलेल्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे ही वेळ पूर्वी प्रमाणे करावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे केली आहे.
करोना विरुद्धच्या युद्धात लाॅक डाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपले पोलिसदल जीवाचे रान करत असून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. याकरता वेळोवेळी आपण विविध निर्बंध जारी करत असून बहुतांश नागरिकांची त्याला साथही मिळत आहे. मात्र हे निर्बंध घालताना नागरिकांना कमीतकमी त्रास होईल असे बघणेही अत्यावश्यक आहे कारण ही दीर्घकाळ चालणारी लढाई असून नागरिकांचा संयम सुटू न देणेही गरजेचे आहे.
सध्या पुण्याच्या बहुतांश भागात सकाळी 10 ते 12 या दोन तासातच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मुभा दिली आहे, अर्थातच त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. यातून या निर्बंधांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातोय. याआधी सकाळी आठ ते बारा असे चार तास खरेदीची मुभा असल्याने फार गर्दी होत नव्हती.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून 10 ते 12 या उन्हाच्या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येकच नागरिकाला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पायपीट करून रांगेत उभे राहून खरेदी करावी लागत आहे. खरं तर दूध, भाजीपाला या गोष्टी पहाटेच शहरात पोचत असल्याने सकाळी आठ वाजेपासून त्याच्या खरेदीची वेळ सुरु केली तर नागरिकांना कमीतकमी त्रास होईल आणि त्यांचं प्रशासनाला उत्तम सहाय्य मिळेल. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.