पुणे – महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा विरोधकांकडून पुढे करण्यात येत आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी ऐतिहासिक दाखला देत, पुण्याचेच नामकरण करण्याचा मुद्दा पुढे केला आहे.
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. मागील पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेला नामकराणाच्या मुद्दावर मार्ग काढता आला नाही. आता शिवसेना पक्ष सत्तेत आहे. तर भाजप विरोधात आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर दडपण टाकण्यास सुरू केले आहे. तर आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
औरंगाबादचे नामकरण करण्याऐवजी पुण्याचेच नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिवसेना-भाजप मागील पाच वर्षे सत्तेत होते. त्या कालावधीत औरंगाबाद शहराचे नाव का बदलले नाही, असा सवाल आंबेडकर यांनी केला. तसेच संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. येथील वडूज गावात त्यांची समाधी आहे. संभाजी महाराज यांचे स्मरण व्हावे, असं वाटत असेल तर पुण्याचे नामकरण संभाजीनगर करावे, असं आंबेडकरांनी म्हटले आहे.
दरम्यान औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. त्यामुळे औरंगाबाद शहर ऐतिहासिकच राहावे, असंही आंबेडकर यांनी नमूद केले.