मुंबई – आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारतीय कसोटी संघात बदल होण्याचे बोलले जात असतानाच कर्णधार विराट कोहलीवरच गंडांतर येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे तसेच पराभवानंतर भारतीय संघात बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत आणि त्याची सुरुवात कर्णधार कोहलीपासून होणार आहे.
अंतिम सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने अतिशय खराब फलंदाजी केली. आता ऑगस्ट महिन्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका पुढील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली मालिका असेल. त्यामुळे भारतीय संघ याची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असेल. यासाठी संघदेखील महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतीय संघ व्यवस्थापन कसोटी स्पेशालिस्ट पुजाराला संघाबाहेर करण्याचा विचार करत आहे. तसेच पुजाराच्या सुमार फलंदाजीमुळे कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर दबाव येत आहे. संघात पुजाराच्या जागी हनुमा विहारी किंवा लोकेश राहुलचा समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोहलीच्या फलंदाजीचा क्रम बदलला जाऊ शकतो. तो सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याच्याऐवजी तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास येऊ शकतो.
जानेवारीपासून पुजाराची फलंदाजी सुमार होत आहे. त्याचा स्ट्राइक रेट 30.20 इतका आहे. तर सर्वोत्तम धावसंख्या 77 आहे. गेल्या 30 डावात त्याने एकही शतक फटकावले नाही.