अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा देत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध
नवी दिल्ली : तीन वर्षापुर्वी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात त्यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याचे म्हटले आहे.
चंदू चव्हाण यांची तीन वर्षापुर्वी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली होती. दरम्यान त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. मी माझ्या समस्या मागील तीन वर्षांपासून लेखी स्वरुपात दिल्या होत्या. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचे आहे असेही त्यांनी सांगितले. मात्र आपले ऐकून घेतले जात नाही अशी तक्रार करत त्यांनी राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या ताब्यात तीन महिने 21 दिवस होते. त्यावेळीही त्यांना त्रास सहन करावा लागला होता.
मी पाकिस्तानातून सुटून आल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला होता. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत त्रास दिला जात होता. शिक्षा दिल्याने माझे मानसिक खच्चीकरण झाले. मला न्याय मिळत नसल्याने मी त्रासाला कंटाळून राजीनामा देतो आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार असे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यावेळी अशा गोष्टी बाहेर येतील ज्या कुणालाच ठाऊक नाहीत असे म्हणून त्यांनी त्यांचे निवेदन संपवले आहे.