नवी दिल्ली – अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 चं आज प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीपणे झेपावलं.
– असा करणार प्रवास
पृथ्वीच्या कक्षेत 16 दिवस
“चांद्रयान – 2′ हे प्रक्षेपणानंतर अवघ्या 16 मिनिटांत पृथ्वीच्या कक्षेत स्थिर झाले. हे यान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर चंद्राच्या दिशेने त्याची वाटचाल होणार आहे. यादरम्यान, त्याची कमाल गती 10 किमी. प्रति सेकंद आणि किमान गती 3 किमी. प्रति सेकंद असेल.
चंद्राच्या कक्षेत 21 दिवसांनंतर प्रवेश
पृथ्वीच्या कक्षेतून 16 दिवसांनंतर “चांद्रयान-2′ बाहेर पडेल. यावेळी “चांद्रयान-2’मधून रॉकेट वेगळे करण्यात येईल. त्यानंतर पुढील पाच दिवसांनंतर हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. यादरम्यान त्याची गती 10 किमी. प्रति सेकंद आणि किमान गती 4 किमी. प्रति सेकंद असेल. यानंतर चंद्रावरील लॅंडिंगची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी…
पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर सुमारे 3 लाख 84 कि.मी. आहे. “चांद्रयान-2’मधील लॅंडर “विक्रम’ आणि रोव्हर “प्रज्ञान’ प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या 4 दिवस आधी रोव्हर विक्रम चांद्रयानातून डिबूस्ट होईल आणि चांद्रभूमीच्या आणखी जवळ पोहोचेल. तेथून लॅंडिंगच्या जागेचे स्कॅनिंग करेल. त्यानंतर विक्रम चांद्रभूमीवर लॅंड होईल आणि त्याचा दरवाजा उघडेल आणि रोव्हर प्रज्ञान बाहेर पडेल. ही प्रक्रिया सुमारे चार तास चालेल. एकदा का रोव्हर चांद्रभूमीवर चालू लागला की पहिल्या 15 मिनिटांत इस्रोकडे या लॅंडिंगची छायाचित्रे येण्यास सुरुवात होईल.