मुंबई – बीड जिल्ह्यात होणाऱ्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर येणार होत्या मात्र पंकजा मुंडे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणालेत.
मुंबईत माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनीही पंकजा मुंडे यांच्याबाबत भाष्य केले. बावनकुळे म्हणाले,”पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात,परवाच माझी त्यांच्याशी चर्चा झाली.त्यांची प्रकृती बरी नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एक नेता गेल्यावर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का ?” असा सवाल बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला. कोणताही वेगळा अर्थ काढू नये पंकजा मुंडे या नेत्या आहेत आणि त्यांचेही वेगळे कार्यक्रम आहेत असं स्पष्ट मत यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
“विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल अफवा पसरवू नये त्या एक प्रगल्भ नेत्या आहेत.पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जणता पार्टी आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, या सर्व केवळ चर्चा आहेत. त्या राष्ट्रीय राजकारण असून त्यांना कोणीही फूस लावू शकत नाही” असा विश्वास देखील यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमात दिसून येत नाहीत. त्यामुळे वारंवार पंकजा मुंडे यांना डावलला जात असल्याची खदखद त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होताना दिसते. या सर्व संघर्षाला आपली तयारी असून रडणार नाही तर लढणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज कार्यकर्त्यांना गेल्या वेळेस सांगितलं होत.